Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिकेची निवडणूक आता रंगतदार वळणार आली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात २० जागांसाठी निर्माण झालेला तिढा सुटला पण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी ३९ उमेदवार उतरवणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष रिपाइंसाठी प्रत्येकी सहा-सहा जागा सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती समोर येत आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी सहा सहा जागा सोडल्यास भाजप आणि शिवसेनेची आधीच्या जागावाटपात बदल होईल. १३७ जागा भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागा असे जागावाटपाचे समीकरण ठरले होते. यामध्ये रिपाइंची एन्ट्री झाल्यानंतर बदल होईल. भाजप 131, शिवसेना 84 आणि रिपाइं 12 असे जागा वाटपाचे गणित असणार आहे. भाजप आणि शिवसेनेने मुंबईसाठी युती केली पण रिपाइंला विचारात न घेतल्याने रामदास आठवले नाराज होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांना दोन्ही पक्ष प्रत्येकी सहा सहा जागा सोडणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. उर्वरित जागा रिपाइं स्वबळावर लढणार आहेत. आता या जागा वाटपाबाबत काय निर्णय होणार याबाबत उद्यापर्यंत स्पष्टता येणार आहे. मुंबई महापालिका (BMC): एकूण २२७ जागा. मतदान: १५ जानेवारी २०२६. निकाल: १६ जानेवारी २०२६. हेही वाचा : मुंबईसाठी शिंदेंचा मास्टरप्लॅन तयार! उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच तगडा शिलेदार उतरवला मैदानात