मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेच्या निर्णयाचा आदर व्यक्त केला आहे. “जनतेचा कौल हा सर्वोच्च असतो आणि तो आम्ही पूर्ण आदराने स्वीकारतो,” असे स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार पुढे म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही, त्या ठिकाणी जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमाने काम करत राहू.” तसेच, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, पराभूत उमेदवारांनाही संदेश देताना अजित पवार म्हणाले की, “जे उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत त्यांनी निराश न होता जनतेसाठी कार्यरत राहावे. जनतेचे भले आणि लोकहित हेच केंद्रस्थानी ठेवून अखंडपणे काम करणे, हेच आपले ध्येय असले पाहिजे”, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.