राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराला हादरवून सोडणाऱ्या खाजगी शिकवणी क्लासमधील दहावीच्या विद्यार्थ्याच्या हत्येच्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. १५ डिसेंबर रोजी त्याच वर्गातील मित्राने चाकूने वार करून विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर, खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने खाजगी शिकवणी क्लासेसच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १६) राजगुरुनगर शहरातील १८ नोंदणीकृत खाजगी शिकवणी क्लासेसची सखोल तपासणी करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथकांची नेमणूक करून ही कारवाई राबविण्यात आली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित बाबींवर विशेष भर देण्यात आला. यामध्ये अग्निशमन यंत्रणा व त्यांची अद्ययावत स्थिती, सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांची कार्यक्षमता, स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शिक्षक व कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे, बायोमेट्रिक उपस्थिती व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरता येतील अशा सुरक्षा उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून कागदोपत्री पडताळणी करण्यात आली.तपासणीत काही मोजक्या क्लासेसमध्ये सुविधा समाधानकारक आढळल्या असल्या, तरी बहुसंख्य क्लासेसमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले तरी ते कार्यरत नसणे, अग्निशमन यंत्रणा कालबाह्य किंवा निष्क्रिय असणे, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे सादर न केल्याचे प्रकार उघडकीस आले. काही क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याची कोणतीही शिस्तबद्ध व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या हालचालींवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासणीत त्रुटी आढळलेल्या सर्व क्लासेसना तात्काळ सूचना देण्यात आल्या असून, ठराविक कालावधीत आवश्यक सुधारणा न केल्यास नोटिसा बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. ही मोहीम केवळ राजगुरुनगर शहरापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण खेड तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. राजगुरुनगरमधील ही कारवाई भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कितपत परिणामकारक ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बेकायदेशीर क्लासेसचा गंभीर प्रश्न दरम्यान, नोंदणीकृत क्लासेस व्यतिरिक्त राजगुरुनगर शहर व परिसरात गृहसोसायटी तसेच घरांमध्ये ५० हून अधिक बेकायदेशीर खासगी शिकवणी क्लासेस सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या क्लासेसवर कोणतेही शासकीय नियंत्रण नसून विद्यार्थ्यांची सुरक्षा पूर्णतः ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र आहे. अशा बेकायदेशीर क्लासेसवर प्रशासन कारवाई करणार का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. पालकांमध्ये समाधान, पण चिंता कायम या कारवाईमुळे अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी केवळ एकदाची तपासणी न करता नियमित निरीक्षण, कठोर अंमलबजावणी व बेकायदेशीर क्लासेसवर बंदी घालण्याची मागणी पालकांकडून होत आहे. नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा केवळ शिक्षण विभागाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा प्रश्न बनल्याची भावना व्यक्त होत आहे.