Bus accident – राज्यात अपघाताचे सत्र सुरू असून अंबा घाटात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बसचा अपघात घडला आहे. हा अंबा घाट महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरीला या मुख्य शहरांना जोडतो. याच घाटात एका खासगी बसचा आज दुर्दैवी अपघात झाला आहे. मध्यप्रदेशचे पासिंग असलेली ही खासगी बस तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये असलेले सर्व प्रवासी नेपाळवरुन आले होते. ते रत्नागिरीतल्या अंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत आणि सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. अपघातात तात्काळ संबंधितांना बाहेर काढण्यात यश आले. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बसचालकाचा ताबा सुटल्याने बस थेट दरीत कोसळली. मात्र दरीत खाली जात असताना ही बस एका मोठ्या झाडावर आधी आदळली. त्यामुळे ती पूर्ण खोल दरीत जाण्यापासून वाचली. यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.