विविधा : माधव विद्वांस
भारतरत्न, गान कोकिळा, गानसम्राज्ञी, “लतादीदी’ अर्थातच लता मंगेशकर यांचे आज अभिष्टचिंतन. त्या आज वयाच्या नव्वद वर्षें पूर्ण करून शताब्दीच्या दशकात प्रवेश करीत आहेत.दीदींचा जन्म इंदूर येथे 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. श्रेष्ठ नाट्य गायक अभिनेते दिनानाथ व माई मंगेशकर यांच्या या ज्येष्ठ कन्या. त्यांना लहानपणीच संगीताचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. त्या 13 वर्षांच्या असतानाच त्यांचे पितृछत्र हरविले. भावंडांत त्या वयाने सर्वांत थोरल्या. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची लहान भावंडे आहेत.
मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक, मास्टर विनायक यांनी लतांच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. वर्ष 1945 मध्ये मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. मुंबईत आल्यावर त्या उस्ताद अमानत अली खॉं (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खॉं यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खॉं (देवासवाले) यांच्याकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खॉं साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंनी संगीताचे धडे घेतले.
लताबाईंनी नाचू या गडे, हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या “किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी वर्ष 1942 मध्ये गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. या वर्षातच मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. तसेच या चित्रपटात त्यांनी “नटली चैत्राची नवलाई’ हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. वर्ष 1946 मधे दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले पा लागूं कर जोरी हे गाणे वसंत जोगळेकरांच्या “आपकी सेवा में’ या हिंदी चित्रपटासाठी गायले.
वर्ष 1949 मध्ये “महल’ या चित्रपटासाठी आयेगा आनेवाला हे गीत त्यांनी गायले व हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले. त्यांनी भावगीताबरोबर सुगमसंगीत, भजन, लावणी, शास्त्रीय, नाट्यगीत, समरगीते, गझल असे हिंदी, मराठी गुजराथी. बंगाली, पंजाबी, कानडी भाषेत गायन केले. भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात 27 जून 1963 रोजी लतादीदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले “ऐ मेरे वतन के लोगों’ हे देशभक्तिपर गीत गायले. त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान भारत सरकारने दिला आहे. या वयातही त्यांचे गायन सुरू आहे.