रांजणगाव : पावसामुळे कांद्यासह कडधान्याचीही वाताहत

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून पडणाऱ्या अनियमित पावसामुळे रांजणगाव परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये मुगी, बाजरी, कडधान्य पावसाने भिजल्यामुळे वाताहत झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे हक्काचे पिक समजलेल्या कांदा पिकाला पावसाने अवेळी हजेरी लावल्याने चांगलेच जेरीस आणले आहे.
दोन-दोन तीन-तीन आठवडे लावगड झालेले कांद्याचे पिक फणपाळी घालण्याच्या परिस्थितीत आले आहे. कारण ऊन व पावसाच्या प्रदूषित खेळांमध्ये कांद्याचे पीक पूर्णतः खराब होऊन गेले आहे. कांद्याच्या पातीचा शेंडा पूर्ण जळून गेला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.
एक एकर कांद्याच्या पिकासाठी साधारणतः 50 हजार रूपये खर्च होत आहे. मात्र आज खर्च केला अन् मातीत गेला अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या कांदा पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे व वाघाळे गावचे माजी उपसरपंच राजेंद्र भोसले यांनी केली आहे.





