नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने काल दिल्लीत जी महारॅली आयोजित केली होती त्यात भाजपच्याही अनेक समर्थक व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते म्हणाले की,दिल्लीतील सेवांवर नियंत्रण ठेवण्याबाबत केंद्र सरकारने जो अध्यादेश आणला आहे त्यावर भाजपचे दिल्लीतील समर्थकही नाराज आहेत हे यातून दिसून आले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील सत्ताधारी पक्षाकडून आमिष दाखवूनही आप समर्थक रॅलीत सहभागी झाले नाहीत, असा दावा भाजपने केला होता. तथापि या रॅलीला कडक उन्हातही मोठी गर्दी झाली होती आणि त्यात भाजप समर्थकांची संख्याहीं लक्षणीय होती असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
एका ट्विटर संदेशात केजरीवाल यांनी म्हटले आहे की मोदींनी हा अध्यादेश आणून योग्य काम केले नाही अशी भाजपच्या समर्थकांचीही भावना झाली आहे. त्यावर उत्तर देताना दिल्ली भाजपने ट्विट केले आहे की, “आपचे लोक रॅलीला आले नाहीत. खुर्च्या रिकाम्या होत्या. 500 रुपये, कार भाड्याने आणि जेवण देऊनही, तुमची फसवणूक ऐकणारे कोणी नव्हते असे भाजपने म्हटले आहे.