रांची- यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात बिहारमधील लालूप्रसाद यांच्या आरजेडी पक्षाला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. बिहारमधील ४० जागांपैकी ३९ जागांवर एनडीएचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षाला मिळालेला हा पराभव आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे .
आरजेडीचे प्रमुख आणि चारा घोटाळाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. सध्या रांचीतील रुग्णालयात ते दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. लालू यांनी एकवेळचे जेवण सोडले आहे. लालू यांनी एकवेळचे जेवण सोडल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच ढासळत चालली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, निवडणुकीतील लाजिरवाणा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असल्याच्या शक्यता आता वर्तवण्यात येत आहेत.