डोंबिवली – डोंबिवली कॉंग्रेस कमिटीच्या वतीने “हात जोडो अभियान’ व एका पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेते मंडळी तब्बल अडीच तास उशिरा पोहोचले. या कार्यक्रमास खासदार कुमार केतकर हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाला सुरूवात होताच कुमार केतकरांनी उशीरा आलेल्या नेत्यांचे कान टोचले. यावेळी बोलताना केतकर म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष हा पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा पक्ष आहे. हे दोन्ही नेते कुठल्याही कार्यक्रमाला कायम वेळेवर हजर होत असत. नेहरू आणि गांधींची लोकप्रियता नक्कीच नाना पटोले आणि कुमार केतकर यांच्यापेक्षा जास्त होती. तरी देखील ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर यायचे.
त्यामुळे याच्यापुढे कायम वेळ पाळावी लागेल. नाहीतर 2024 मध्ये मोदींचे सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासांनी पोहोचू, असे बोलत खासदार केतकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचले.
केतकर पुढे म्हणाले, 2014 ला असा टाइम टेबलचा घोटाळा करून चालणार नाही. 2024 ची निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला आजपासून दररोज टाइम टेबल पाळावं लागेल. ज्यांनी आयुष्यभर कॉंग्रेसच्या शपथा घेतल्या ते सगळे कॉंग्रेस पक्ष सोडून गेले. आपल्यापैकी कोणी सोडून गेले नाही, आपल्या कोणाच्याही घरी ईडी, सीबीआयवाले आले नाहीत कारण आपण काही केलेले नाही.