पाच सदस्यांची टीम करणार अपघाताची चौकशी
कोझिकोड : केरळमधील कोझिकोड विमानतळावर मागील आठवड्यात एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचा अपघात झाला होता. याच अपघाताच्या चौकशीचे आदेश एअरक्राफ्ट अपघात अन्वेषण ब्युरोने दिले आहेत. आता या विमान अपघाताची चौकशी कॅप्टन एस. एस. चाहर यांच्या नेतृत्वात पाच सदस्यांची टीम करणार आहे. हे पथक अपघातास कारणीभूत आणि संभाव्य कारणे शोधणार आहे. तसेच भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिफारसी देखील करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तपास प्रभारी कॅप्टन एस एस चाहर 5 महिन्यांत आपला अहवाल सादर करतील.
कोझिकोड विमान अपघात हा अपघात नसून खून असल्याचे हवाई सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी म्हटले होते. सुरक्षा सल्लागार समितीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने हा अपघात झाल्याचे ते म्हणाले. त्यांच्या स्वत:च्या लेखापरीक्षणामध्ये सुरक्षाविषयक समस्या नोंदवण्यात आल्या होत्या. हा अपघात टाळता आला असता, असेही रंगनाथन म्हणाले होते. नागरी उड्डाण मंत्रालयाने गठीत केलेल्या सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य असलेले रंगनाथन म्हणाले होते की, कालिकत (आता कोझिकोड) विमानतळ लॅंडिंगसाठी सुरक्षित नाही, असा इशारा त्यांनी नऊ वर्षांपूर्वी दिलेल्या अहवाल दिला होता.
दरम्यान, या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला होता. तर 170 लोकांचा वाचवण्यात आले होते. एअर इंडियाचे विमान (IX-1344) मध्ये 190 लोकं होती. ज्यात 174 प्रवाशी, 10 मुलं, 4 केबिन क्रू आणि 2 पायलट होते. अपघातातील सर्व जखमींना मल्लपुरम आणि कोझिकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पावसामुळं विमान कोझिकोड रनवेवरुन घसरले आणि 35 फुट खाली कोसळले. एअर इंडियाच्या IX-1344 या विमानाचे दोन तुकडे झाले. दुबईवरुन येत असलेलं विमान अचानक दरीत कोसळलं आणि मोठा आवाज झाला होता. विमानात अडकलेल्या लोकांची आरडाओरड, ऍम्ब्युलेंसच्या आवाजाने परिसर दणाणला होता.