नवी दिल्ली: आयपीएलच्या बाराव्या मोसमातील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना फिक्स असल्याची चर्चा सोशल मेडियावर एका व्हिडीयोच्या माध्यमातून होत असून यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्टीकरण दिले असून बीसीसीआयने हा सामना फिक्स नव्हता असे स्पष्ट केले आहे.
यावेळी कोलकात्याची फलंदाजी सुरु असताना, दिल्लीचा संदीप लामिच्छाने चौथे षटक टाकत होता. यावेळी ऋषभ पंतने यष्टींमागून क्षेत्ररक्षणातल बदल करत असताना, ये तो वैसे भी चौका हे (यापुढचा चेंडू वर चौकारच जानार आहे) असे वक्तव्य केले होते. स्टम्पजवळ लावलेल्या माईकमध्ये पंतचे हे वक्तव्य रेकॉर्ड झाले होते. मात्र, त्या वाक्याआधी ऋषभ पंत नेमक काय बोललाय हे कोणीही ऐकल नव्हत. कदाचीत तो कर्णधार श्रेयस अय्यरला ऑफ साईडला चौकार थांबवण्यासाठी क्षेत्ररक्षक वाढवण्यासाठीही सांगत असेल. असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना स्पष्टीकरण दिले.
यावेळी बोलताना बीसीसीआयचा अधिकारी पुढे म्हणाला की, ऋषभने ते वाक्य नेमक्या कोणत्या अनुषंगाने म्हटले हे देखील व्हिडीओमधून स्पष्ट होत नाहीये. नेमके काय घडले हे जाणून न घेता एखाद्या तरुण खेळाडूची कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. एखाद्या व्हिडीओची सत्यता न पडताळता काही प्रसारमाध्यमांनी याला फिक्सींगचे स्वरुप देऊन बातम्या केल्या आहेत. हा प्रकार योग्य नसल्याचेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.