कोल्हापूर – कोरोना संसर्गामुळे यावर्षी सर्व धार्मिक कार्यक्रम हे लोकसहभागाशिवायच पार पाडले जात आहेत. नवरात्रोत्सव जवळ आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवरात्र काळात
कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.
परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसेच 9 दिवस धार्मिक कार्यकर्माचेही आयोजनही करण्यात आले आहे. मात्र, या 9 दिवसात मंदिराचे चारही दरवाजे बंद राहणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.
भाविकांना मंदिरात जरी जाता आले नाही तरी थेट प्रक्षेपणाद्वारे देवीचं दर्शन घेता येणार आहे. कोल्हापूर शहरातील चौकांमध्ये मोठ्या स्क्रीन लावल्या जाणार आहेत. असेही जाधव यांनी सांगितले.
कोरोनामुळे मागील 7,8 महिन्यात मंदिराचं 10 कोटी रूपयांचं उत्पन्न घटलं आहे. तरीदेखील मंदीराकडून राज्य सरकारला मदत केल्याचे जाधव यांनी सांगितले.