जयपूर : राजस्थानमधील अंता विधानसभा पोटनिवडणूकीनंतर, भजनलाल सरकारच्या मंत्रीमंडळातील फेरबदलांची जोरदार चर्चा सुरु आहे. निवडणूकीनंतर सरकार आणि पक्षामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या नियमानूसार पुढील वर्षी अनेकांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. ही चर्चा सुरु असतानाच भजनलाल सरकारमधील मंत्री असलेल्या किरोडी लाल मीणा यांनी आपल्याला मंत्रीपदावर राहण्याची फारशी इच्छा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थानमधील राजकिय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असल्याचे मानले जावू लागले आहे. गेल्यावर्षी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपने दौसासह काही जागा गमावल्या होत्या. त्यानंतर किरोरी लाल मीणा यांनी जबाबदारी स्विकारताना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, दिल्लीतून हायकमांडचा आदेश आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद स्विकारले होते. परंतू त्यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकिय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. कृषीमंत्री असलेल्या मीणा यांचा कृषी विभाग चांगले काम करत असून आपले काम वेगाने पूर्ण करत आहे. त्यामुळे अपेक्षित कामे झाली आहेत, असे मीणा यांनी स्पष्ट केले होते. याबरोबरीने मंत्रीमंडळात फेरबदल करणे किंवा त्याचा विस्तार करणे हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यात किंवा निर्णयात आपला पाठिंबा असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. मंत्रीमंडळात नवीन व तरुणांना संधी देण्याविषयी देखील सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा निर्णय मला मान्य पुढील वर्षी किरोडीलाल मीणा हे 75 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे कदाचित पक्षाच्या नियमांनूसार त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. या संदर्भात बोलताना मीणा म्हणाले की, मला मंत्रीपदाची इच्छा नव्हती. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा पक्ष जो निर्णय घेली तो मला मान्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मीणा यांच्या वयाची 75 वर्षे पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना सुद्धा त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे.