Khopoli Municipal Council – खोपोली नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात काही नगरसेविकांच्या पतींचा वाढता हस्तक्षेप होत असल्याच्या चर्चेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. विविध विकासकामे, प्रशासनाशी समन्वय तसेच प्रभागातील निर्णय प्रक्रियेमध्ये नगरसेविकांच्या पतींची वाढती सक्रियता पाहता निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हस्तक्षेपामुळे विकासकामांवरून श्रेयवाद वाढत असून याचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खोपोली शहरात सध्या विविध विकासकामांना वेग देण्यात येत आहे. रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी कामांमुळे स्थानिक राजकारणातही हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक प्रभागात स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसत असतानाच काही नगरसेविकांचे पती स्वतःच लोकप्रतिनिधी असल्याप्रमाणे वावरत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः सोशल मीडियावर विकासकामांचे फोटो, उद्घाटने, विकासकामांची पाहणी आणि नागरिकांशी संवाद यामध्ये काही नगरसेविकांच्या पतींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी प्रशासनाशी थेट संपर्क साधणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे तसेच कामांच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी कोण आणि प्रत्यक्ष कामकाजावर प्रभाव कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगरपालिकेतील काही नगरसेवकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने अधिकृत लोकप्रतिनिधींनाच महत्त्व द्यावे, अशी मागणी केली आहे. जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांना डावलून इतर व्यक्तींना महत्त्व दिले जात असेल तर लोकशाही प्रक्रियेलाच धक्का बसतो, अशी भावना काही सदस्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चांगलाच गाजला. सभागृहात काही सदस्यांनी थेट प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगरपालिकेचे अधिकारी नेमके कोणाचे ऐकतात? असा सवाल उपस्थित केला. काही नगरसेविकांचे पती आणि कार्यकर्ते स्वतःच नगरसेवक असल्याच्या आविर्भावात वागत असल्याची टीका देखील यावेळी करण्यात आली. एकूणच, खोपोली नगरपालिकेतील प्रशासकीय कामात नगरसेविकांच्या पतींच्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा आता उघडपणे चर्चिला जाऊ लागला असून यामुळे स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आगामी काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय कसा राखला जाणार, तसेच या प्रकारावर काय तोडगा निघणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. श्रेयवादामुळे निर्माण होतेय गटबाजी वाढत्या श्रेयवादामुळे काही प्रभागांमध्ये अंतर्गत गटबाजी निर्माण होत असल्याचेही बोलले जात आहे. विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्टबाजी, बॅनरबाजी आणि उद्घाटनांच्या माध्यमातून स्पर्धा वाढल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे प्रशासनावरही अप्रत्यक्ष दबाव निर्माण होत असल्याची चर्चा आहे.