जामखेड -मान्सून सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला दिले होते. परंतु महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसात शहरातील विजेचा खेळखंडोबा झाला. अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता.
काल (दि. 31) जामखेड शहरात वारा सुटून पावसाचा हलकासा शिडकाव झाला. या पहिल्याच वळवाच्या पावसामध्ये शहरातील वीजयंत्रणेने मान टाकली. हलका वारा आणि छोटासा पाऊस आला, तरी विजेचा खेळखंडोबा मात्र मोठा होत असल्याचे चित्र आहे. वळवाच्या पहिल्याच पावसामध्ये निम्म्याहून अधिक शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी शहरातील कमकुवत वीजयंत्रणेचे पितळ या निमित्ताने पुन्हा उघडे झाले.
जोरदार पावसाळा सुरू झाल्यानंतर वीजयंत्रणेची स्थिती काय असेल, याचे उत्तर वळवाच्या पावसात मिळाले आहे. त्यामुळे कमकुवत यंत्रणेसह पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीचा मुद्दाही पुन्हा समोर आला आहे. वळवाचा पाऊस वादळ-वाऱ्यासह याच कालावधीत येतो, याची कल्पना असतानाही पुरेशी खबरदारी का घेतली जात नाही, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. दर पावसाळ्यात जोरदार पावसाला सुरवात होताच शहरातील वीजपुरवठा खंडित होतो.त्यामुळे महावितरणने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.