प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – निर्मळवाडी साकुर्डी ता खेड येथील घाटामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाल्याने आठ कामगार जखमी झाले. काही दिवसांपूर्वी झालेल्या श्री कुंडेश्वर घाटात असाच अपघात झाला होता.याबाबत सरपंच रोहिणी गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.८) रोजी राजगुरुनगर येथून ९ ते १२ कामगार निर्मळवाडी येथील एका घराचा स्लॅब टाकण्यासाठी टेम्पो क्रं एमएच ०५ एस ८२५ याने जात होते. निर्मळवाडी घाट अत्यंत अरुंद आणि घाटात मोठं मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे साईडपट्या वाहून गेल्याने घाट धोकादायक झाला आहे. या घाटातून कामगारांना घेऊन जात असताना अरुंद व नागमोडी वळनावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. यामध्ये मुकेश बारेला, हुकूम बारेला, राकेश बारेला, कुमार बारेला, हरदेव मंडल, धनंजय मंडल, विलास मंडल, मुकेश कुमार (सध्या रा. राजगुरूनगर) हे २२ ते ३० वर्षे वयाचे तरुण कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला पायाला गंभीर दुखापती झाल्या असून दोघांतिघांचे हात पाय मोडले आहेत. अपघात झाल्याचे समजतात सरपंच रोहिणी गवारी, साकुर्डीचे पोलीस पाटील डॉ. अजित चौधरी यांनी तात्काळ खेड पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिका चालकांना मोबाईलद्वारे कळवले. घटनास्थळी जवळपासच्या ३ रुंग्णवाहिका दाखल झाल्या. त्यामधून सुनील बोंबले, रामदास निर्मळ, दत्ता कदम, उल्हास देवदरे आदी ग्रामस्थांनी अपघातग्रस्त युवकांना उपचारासाठी पाठवले. शंकर गवारी, पप्पू बनसोडे, पंकज खंडे, प्रथमेश मुंगसे यांनी चांडोली ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्त व्यक्तींवर उपचार करण्यासाठी प्रयत्न केले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी डॉक्टरांशी संपर्क करून जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांना सूचना केल्या. “साकुर्डी गावातील निर्मळवाडी घाट अरुंद आणि धोकेदायक आहे. यापूर्वीही रेशन आणायला जाणाऱ्या ग्रामस्थांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. या घाटाची रुंदी वाढवण्यासाठी आणि धोकेदायक वळणावर रेलिंग बसवण्याची मागणी केली आहे. शासनाकडून विशेष बाब म्हणून निर्मळवाडी घाटाला निधी उपलब्ध करून द्यावा.” -रोहिणी गवारी, सरपंच साकुर्डी