Khatav News – राज्य शासनाने प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी बहुतांश शासकीय सेवा ऑनलाईन केल्या असल्या, तरी गेल्या आठ दिवसांपासून ‘आपले सरकार’ आणि ‘महाऑनलाइन’ या मुख्य पोर्टलचा सर्व्हर पूर्णपणे कोलमडल्याने खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे जगणे अक्षरशः कठीण झाले आहे. तांत्रिक बिघाडामुळे अत्यावश्यक दाखले मिळत नसल्याने नागरिकांना तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रांवर वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. भर उन्हात ४० अंश सेल्सिअस तापमानात नागरिकांची होणारी परवड संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ एप्रिलपासून ‘महाऑनलाइन’ व ‘आपले सरकार’ या संकेतस्थळांच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमीलेअर, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांसाठी नवीन अर्ज दाखल करणे अशक्य झाले आहे. अनेक नागरिकांनी यापूर्वीच अर्ज सादर केले असून त्यांचे दाखले मंजूर झालेले असतानाही सर्व्हर बंद असल्यामुळे ते डाऊनलोड करता येत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सर्व्हर डाऊन (संग्रहित छायाचित्र) सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विविध शासकीय व शैक्षणिक कागदपत्रांची तातडीची आवश्यकता आहे. मात्र दाखले उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि पालक रोज सेतू केंद्रांवर येत असून “आज सर्व्हर सुरू होईल” या आशेवर तासनतास प्रतीक्षा करत आहेत. सेतू केंद्र चालक आणि कर्मचाऱ्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. “सर्व्हर बंद असल्याने आम्हीही हतबल आहोत,” अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी दिली. तांत्रिक अडचणीमुळे दिवसभरात एकही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदरचा तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून ‘आपले सरकार’ आणि ‘महाऑनलाइन’ सेवा पूर्ववत सुरू कराव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा विचार करून आवश्यक दाखले ऑफलाईन पद्धतीने देण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आम्हींही याबाबत हतबल आहोत गेली अनेक दिवस वरूनच सर्वर बंद असल्याने आम्हींही याबाबत हतबल आहोत. विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय आम्ही समजू शकतो, आम्हांला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. महाराष्ट्र अभियान दिनच्या दिवशी देखील सर्व्हर बंद असल्याने आम्हाला कसलेच दाखले देता आले नाहीत. कलेक्टर ऑफिसला आम्ही एन आय सी विभागाकडे यासंदर्भात विचारणा केली आहे. लवकरच ही समस्या दूर होईल असे सांगण्यात आले आहे.” – महेश गायकवाड, नायब तहसीलदार