Khashaba Jadhav : स्वातंत्र्योत्तर भारताला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे ‘पॉकेट डायनॅमो’ म्हणून ओळखले जाणारे महान पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव (Khashaba Jadhav) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. न्यायालयाने केंद्र सरकारला ४ मे २०२६ पूर्वी या प्रस्तावावर सकारात्मक व अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांना तब्बल ७४ वर्षांनंतर मरणोत्तर सर्वोच्च नागरी सन्मान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाचा केंद्र सरकारला दणका ‘कुस्तीवीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) फाउंडेशन’च्या वतीने नोव्हेंबर २०२५ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर १५ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी झाली. न्यायमूर्ती माधव जामदार आणि प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या वेळकाढू धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, खाशाबा जाधव यांची ऐतिहासिक कामगिरी निर्विवाद आहे आणि सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे हा सन्मान इतके वर्षे रखडला आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला स्पष्ट आदेश दिले की, ४ मे २०२६ पूर्वी या प्रकरणावर योग्य निर्णय घ्या. प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. रणजित जाधवांचा प्रदीर्घ संघर्ष खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांनी वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे लढा दिला. २०१७ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराची फाईल सरकार दरबारी गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. अखेर निराश होऊन रणजित जाधव यांनी ‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन’च्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या लढ्यात त्यांना विविध संघटनांचा आणि कुस्ती विश्वाचे समर्थन मिळाले आहे. Khashaba Jadhav कोण होते खाशाबा दादासाहेब जाधव? खाशाबा दादासाहेब जाधव हे भारताचे नामांकित फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर गावी झाला. वडील दादासाहेब हे स्वतः ख्यातनाम पैलवान होते आणि घरी नियमित कुस्तीचे डाव रंगत. याच वातावरणात खाशाबांना कुस्तीचे पहिले धडे मिळाले. उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले आणि राजाराम महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. येथे बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांच्याकडून त्यांना प्रगत कुस्तीचे प्रशिक्षण मिळाले. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरी १९४८ लंडन ऑलिम्पिक : फ्लायवेट गटात सहभागी झाले, पण यश मिळाले नाही. १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक : ५७ किलो वजन गटात त्यांची निवड झाली. आर्थिक अडचणींमुळे प्रवास कठीण होता, मात्र गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांना मदत केली. हेलसिंकीत खाशाबा यांनी सेमीफायनलपर्यंत मजल मारली. जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिकोच्या विरोधकांना पराभूत करत त्यांनी कांस्य पदक पटकावले. स्वतंत्र भारताला वैयक्तिक गटात मिळालेले हे पहिले ऑलिम्पिक पदक होते. त्यांच्या या यशाने संपूर्ण देशात अभिमानाची लहर निर्माण झाली. १४ ऑगस्ट १९८४ रोजी या महान कुस्तीपटूचे निधन झाले.