Khalid Rasheed Firangi Mahali : “मुस्लिम घाबरलेले नाहीत” ; बाबा रामदेव यांच्या ‘हिंदू राष्ट्र’ वक्तव्यावर इमाम खालिद रशीद यांची प्रतिक्रिया
Khalid Rasheed Firangi Mahali :

Khalid Rasheed Firangi Mahali : योगगुरू बाबा रामदेव यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात केलेल्या ‘हिंदू राष्ट्र’ संदर्भातील वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी “हिंदू राष्ट्र” या संकल्पनेला घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगत सर्व भारतीयांचे पूर्वज सनातनी आर्य-वैदिक परंपरेशी संबंधित असल्याचा दावा केला. या वक्तव्यावर आता लखनौ ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली म्हणाले, “मुस्लिम घाबरलेले किंवा भयभीत नाहीत, कारण ते अल्लाहवर श्रद्धा ठेवतात. सर्व मानवांचे पूर्वज एकच आहेत, हीच वस्तुस्थिती आहे. आम्ही नेहमीच धर्माच्या आधारावर भेदभावाला विरोध केला आहे. देशाची परिस्थिती सुधारायची असेल, तर प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करत इतरांच्या श्रद्धेचा आदर करावा आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये टाळावीत.”
ते पुढे म्हणाले की, उत्तराखंडमध्ये मशिदी पाडण्याच्या घटना आणि मदरसा बोर्ड रद्द करण्याच्या निर्णयामुळे मुस्लिम समाजात दुःख आणि नाराजीचे वातावरण आहे.
बाबा रामदेव नेमके काय म्हणाले? Khalid Rasheed Firangi Mahali :
दिल्ली विद्यापीठात रविवारी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी सांगितले की, 2009 मध्ये त्यांना हरिद्वारजवळील देवबंद येथे आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी उपस्थितांना सांगितले होते की, धर्म वेगवेगळे असले तरी सर्वांचे पूर्वज एकच आहेत.
रामदेव म्हणाले, “हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला कोणीही घाबरण्याची गरज नाही. आपल्या सर्व पूर्वजांचा संबंध सनातन आर्य-वैदिक परंपरेशी होता. काही लोक विचारतात की हिंदू राष्ट्र स्थापन झाले तर मुसलमान कुठे जातील? माझे उत्तर आहे की, आपल्या पूर्वजांच्या परंपरा स्वीकारा. दाढी ठेवायची की नाही, कोणते कपडे घालायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे; मात्र पूर्वजांचे चारित्र्य आणि मूल्ये जपली पाहिजेत. भारतात मुसलमान किंवा ख्रिश्चनांना कोणताही धोका नाही.”






