- अवेळी पावसामुळे वीट व्यावसायिकांचे मोठे नुकसान
- संकटात सापडलेल्या वीट कारखानदारांना शासनाच्या मदतीची अपेक्षा
खालापूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे वीटभट्टी मालकांची आपल्या कच्च्या वीटा वाचवण्याकरीता तारांबळ उडाल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील काही भागात पाहायला मिळाले; परंतु पावसाचा जोर अधिक असल्यामुळे वीटभट्टी चालकांचे प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरल्याने वीट भट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे वीटभट्टी व्यवसाय संकटात आल्याचे पाहायला मिळत आहे.
याशिवाय अजूनही पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली असल्यामुळे वीटभट्टी मालकांचे अधिक मोठे नुकसान होणार या भीतीपोटी कच्च्या वीटा वाचविण्यासाठी वीटभट्टी मालकांची धावपळ करीत आहेत. वीट भट्टी व्यावसायिकांना या संकटातून सावरण्यासाठी शासनाने मदत मिळावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
खालापूर तालुक्यासह सर्वत्र गुरुवारी (दि. 7) दुपारनंतर अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे सर्वत्र ठिकाणी वातावरणात गारवा निर्माण झाला. वातावरणातील गारव्यामुळे उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली. खालापूर तालुक्यात शासनाचा कर भरून या वीट बनविणाऱ्या कारागीर परराज्यातून आणावे लागतात. त्यांचा 8 महिने कुटूंबासारखा सांभाळ करावा लागतो. या वर्षातील दिवाळी संपल्यानंतर वीट बनविण्यासाठी सुरुवात होते. या वेळेस मात्र दुसऱ्यांदा या अवकाळी पावसाने झटका दिला. गुरुवारी पडलेल्या पावसाच्या सरी तासभर सुरूच होत्या. त्यामुळे बनविलेली वीट वाचविण्यासाठी ताडपत्रीच्या साह्याने बचाव करताना मोठीच तारांबळ उडाली असल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळाले.
तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय सुरू आहेत. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात बरसल्याने वीट व्यवसाय मोठा संकटात आल्याचे खालापुरात पाहायला मिळत आहे. पुढे काळात कच्च्या विटांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक वीटभट्टी व्यापारी व मालक काळजी घेत प्लॅस्टिक कागद टाकून विटांची संरक्षण करीत आहेत.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे वीट व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागणार असल्याने आम्हा वीट व्यवसायिकांसह वीटभट्टीवर काम करणाऱ्या सर्व कामगारांवर मोठे संकट उभे राहिले. या संकटातून आम्हाला सावरण्यासाठी शासनाने आम्हाला “रॉयल्टी’मध्ये सवलत द्यावी त्यामुळे वीट व्यवसायिकांना या नुकसानीतून सावरता येईल.
– आजिम कर्जीकर, अध्यक्ष, वीट व्यवसायिक संघटनागेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे तयार केलेल्या सर्व कच्च्या वीटाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे वीट व्यावसायिकांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याने या व्यावसायासाठी परराज्यातून कारागीर आणावे लागतात. त्यांची पूर्ण जबाबदारी व्यावसायिकांवरच असते, त्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे वीट व्यावसायिकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने या व्यावसायिकांना मदत करावी.
उत्तम परबळकर, सदस्य, पंचायत समिती, खालापूर.