खालापूर – खोपोली नगरपालिका निवडणुकीचा मतदान दिवस जवळ येताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रचाराची धामधूम वाढल्याने कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या दारोदारी वारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे घरोघरी वाढलेले बिनकामाचे पाहुणे अशी मतदारांची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. अनेक मतदार उमेदवारांच्या स्वागत आणि सत्कारात मग्न असले तरी काहीजण या अवाजवी गर्दीमुळे त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. दिवसा वाढत्या उकाड्याचा आणि संध्याकाळी जाणवणाऱ्या थंडीच्या कडाक्याचा त्रास सहन करत सर्वसामान्य नागरिक दैनंदिन कामे सांभाळत असतात. त्यातच राजकीय कार्यकर्त्यांच्या सततच्या भेटीमुळे अतिरिक्त घोळ निर्माण झाला आहे. निवडणूक जोर पकडताच विविध पक्षांनी प्रचार मोहीम वेगात चालू केली आहेत. बहुमत मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. पूर्वी सामान्यांच्या अडचणींना दूरून पाहणारे काही राजकीय चेहरे आता मात्र घराघरात येऊन आईबाप कसे आहेत, मावशी-दादा घरी आहेत का, यांसारखी चौकशी करताना दिसत आहेत. गावागावांत आणि प्रत्येक प्रभागात सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. विरोधकांचा प्रभाव कमी ठेवण्यासाठीही अनेक पक्षांनी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रांत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याची धडपड सुरू केली आहे. एका पक्षाचे कार्यकर्ते परत फिरण्याआधीच दुसऱ्या पक्षाचे प्रतिनिधी दारात उभे राहतात, अशी परिस्थिती अनेक घरांमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, सामान्य प्रसंगी संपर्कात नसणारे राजकीय पदाधिकारी आता मात्र निवडणुकीच्या निमित्ताने कुटुंबातील लहानथोरांची आणि नातेवाईकांची विचारपूस करत आहेत, अशी चर्चा शहरात रंगली आहे. मतदार एकीकडे या निवडणूक पाहुणचाराने त्रस्त असले तरी काहीजण समाधान व्यक्त करत, उमेदवारांकडून यापुढेही अशाच सक्रियतेची अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत.