जळगाव: मुख्यमंत्रीची महाजनादेश यात्रा सुरू असून ही यात्रा शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. मात्र या महाजनादेश यात्रेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्याच जिल्ह्यातील कार्यक्रमात भाषण करण्याची संधी डावलण्यात आल्याचे चित्र आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री हे अडीच तास उशिरा आल्याने खडसे यांना अर्धा तास मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागले.
मुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्या आणि खडसेंच्या खुर्चीमध्ये बरेच अंतर ठेवण्यात आले होते. दरम्यान सभेची वेळ १:३० वाजता ठरविण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री ४ वाजता सभास्थळी दाखल झाले. तर एकनाथ खडसे ३:३० वाजेपासूनच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर ते अर्धा तास ताटकळत बसले. काही वेळाने आमदार हरिभाऊ जावळे हेही व्यासपीठावर पोहोचले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी आमदार सुरेश भोळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भाषणे झाली. परंतु, खडसे व्यासपीठावर उपस्थित असूनही त्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या मुख्यमंत्र्यांची सभा होणार नसल्याने राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा होती. त्यातच आता जिल्ह्यातील कार्यक्रमात भाषणाची संधी न दिल्याने याचर्चांना उधाण आले आहे.