जिल्ह्यातील 14 धरणेही निम्मी भरली
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत अशा चार धरणात मिळून 17.65 टीएमसी म्हणजे 60.54 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याचवेळी चारही धरणे काठोकाठ भरली होती. खडकवासला धरण सुमारे 95 टक्के भरल्याने साठा नियंत्रित करण्यासाठी 1,103 क्युसेकने कॅनॉलद्वारे विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. भीमा खोऱ्यातील प्रमुख 24 धरणांपैकी 14 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.
कळमोडी धरणात 81.67, आंद्रा-81.84, कासारसाई 85.06, खडकवासला-94.79, गुंजवणी-83.39 आणि वीर धरणात 86.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर जिल्ह्यातील धरणांमध्ये दि. 1 जूनपासून सर्वाधिक पाऊस हा टेमघर धरण क्षेत्रात झाला असून या ठिकाणी 1,496, मुळशी-1,454, वरसगाव-1,032, वडीवळे- 1,036, गुंजवणी-1,101, चासकमान-422, भामा-आसखेड परिसरात 409 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.