पुणे – खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये एकूण 12.97 टीएमसी म्हणजे सुमारे 43 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 4.58 टीएमसी इतका जादा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही.
मान्सूनसह परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे यंदा धरणे काठोकाठ भरली. टेमघर धरण दुरुस्तीमुळे डिसेंबरमध्ये रिकामे करण्यात आले. सध्या खडकवासला धरणात 0.96 टीएमसी, पानशेत-6 टीएमसी आणि वरसगाव-5.56 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी एकूण 7.90 टीएमसी म्हणजे 27 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. या परिस्थितीमुळे शेतीचे आवर्तन कमी करण्यात आले होते.
शेतीसाठी आवर्तन सुरू
खडकवासला धरणातून शेतीसाठी दि.24 मार्चपासून आवर्तन सुरू करण्यात आले. सध्या 1205 क्युसेकने पाणी कालव्यात सोडण्यात येत असून याचा फायदा हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामतीच्या शेतीला होणार आहे.