Khadakwasla Canal – खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान असलेल्या कालवा परिसरात झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने कंबर कसली आहे. येथील झोपडपट्ट्यांना नोटिसा बजावल्या असून कालव्याच्या प्रत्येक पाच किलोमीटरसाठी चार अभियंते असे अतिरिक्त ५० अभियंते या मोहिमेसाठी नियूक्त केले आहेत. तसेच कालव्याच्या परिसरातील झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी तेथे सीमा भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खडकवासला धरण परिसरातील वाढत्या अतिक्रमणांबाबत तक्रारी आल्यानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याची गंभीर दखल घेत ही अतिक्रमणे तातडीने काढावीत असे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार गेल्या महिन्यांपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम विभागाने हाती घेतली होती. यापूर्वी धरण परिसरातील १०० अतिक्रमणे काढण्यात आली असून कालव्यावरील २५ हेक्टरपैकी पाच हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली. ही मोहीम आणखी कडक करण्याच्या सूचना मंत्र्यांनी विभागाला दिल्या आहेत. खडकवासला धरणातून फुरसुंगीपर्यंत असलेला कालवा पुणे शहरातून जातो. शहर व परिसरात कालव्याच्या भागात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे. त्यामध्ये झोपडपट्ट्यांची संख्या जास्त आहे. या सर्व झोपडपट्ट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत .जलसंपदा विभागाने अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी ड्रोन सर्व्हे करण्यात आले होते. अतिक्रमणांमध्ये रिसॉर्ट हॉटेल तसेच घरांचाही समावेश असल्याचे दिसून आले होते.