‘राहुल गांधींनी 1 वर्ष तरी RSS च्या शाखेत जावे, म्हणजे त्यांना…’, भाजप नेत्याने सांगितला संघात जाण्याचा फायदा

Keshav Prasad Maurya on Rahul Gandhi | गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे 84 वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर जोरदार टीका केली. त्यांनी संघाच्या मुखपत्र ‘ऑर्गनायझर’चा हवाला देत ख्रिश्चन समुदायावर हल्ल्यांची तयारी सुरू असल्याचा आरोप केला होता.
राहुल गांधींनी वक्फ विधेयकावरून भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली होती. यावर आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते केशव प्रसाद मौर्य प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींनी संघाच्या शाखेत जावे. म्हणजे त्यांना संघ काय काम करतो हे कळेल, असे प्रत्युत्तर मौर्य यांनी दिले.
राहुल गांधींवर निशाणा साधत केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, राहुल गांधी यांनी किमान एक वर्ष तरी RSS च्या शाखेत घालवावे. म्हणजे त्यांना संघ म्हणजे काय हे समजेल. आरएसएसमध्ये राष्ट्रवाद, समाजसेवा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीचे शिक्षण दिले जाते. राहुल गांधी यांनी अशा प्रकारची दिशाभूल करणारी वक्तव्यं टाळायला हवीत.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना राहुल गांधींनी वक्फ विधेयकावरून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, भाजपने लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केले. हा धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानावर हल्ला आहे. आरएसएसच्या मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये लिहिले आहे की ख्रिश्चनांवर हल्ला होणार आहे. हे धर्मविरोधी विधेयक आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला हे माहित असले पाहिजे. बांगलादेश भारताविरुद्ध विधाने करत आहे. भारताचे पंतप्रधान तिथे त्या नेत्यांना भेटले. त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
आम्ही ब्रिटिशांविरुद्ध आणि आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध लढलो. त्यांची विचारसरणी स्वातंत्र्यलढ्याची विचारसरणी नाही. ज्या दिवशी संविधान लिहिण्यात आले, त्याच दिवशी रामलीला मैदानात संघाने संविधान जाळले होते. वर्षानुवर्षे, आरएसएसने तिरंग्याला सलाम केलेला नाही, अशी जोरदार टीका त्यांनी संघावर केली.





