नगर (प्रतिनिधी) – घातक राजकारणाला बाजूला ठेवण्यासाठी आपली राज्यघटना, लोकशाही वाचली पाहिजे. त्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. एकीकडे देशात दंगली घडत असतांना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे स्वागत करण्यात येत होते, हा प्रकार सर्वात दुर्दैवी असल्याची टीका महसूलमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
जिल्हा कॉंग्रेस कमिटी व संलग्नित सर्व संघटनांचा थोरात यांनी आज दि. 8 नगरमध्ये आढावा घेतला. त्यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्ञानदेव वाफारे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अचानकपणे माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आली. ते आव्हान मी स्वीकारले. विधानसभेला पक्षाच्या 44 जागा निवडून आल्या. त्यावेळी राज्यात सरकार स्थापन होणार नाही असे सर्वांना वाटत होते. मात्र शिवसेनेने घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे ते शक्य झाले. देशातून द्वेष पसरविणाऱ्या राजकारणाला दूर ठेवायचे असेल तर भाजप विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
राज्यात ज्याप्रकारे परिवर्तन झाले त्याप्रकारे देशातही परिवर्तन होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षवाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पक्षाची स्थिती बदलण्यासाठी आपल्याला गावापासून सुरुवात करावी लागणार आहे. कार्यकर्त्यांचं संघटन वाढवावं लागेल. त्याप्रमाणे सर्वांनी काम करावे. अनेक तालुक्यांमध्ये आपले आमदार नाहीत मात्र जुने कार्यकर्ते आहेत. त्यांची मदत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन थोरात यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे काळे कॉंग्रेसमध्ये
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर शहरातून विधानसभा लढविलेले किरण काळे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळकेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जवळपास दहा वर्षे काम केले आहे. राष्ट्रवादीमध्ये असताना काळे आणि आ.संग्राम जगताप यांच्यामध्ये कायम सवतासुभा राहिला. याचे पर्यावसन अनेक वेळा संघर्षात देखील झाले. याच संघर्षातून काळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला रामराम ठोकत बंड पुकारले होते. आता मात्र युवक कॉंग्रेसच्या शहरात शंभर शाखा उघडणार असल्याचे ही किरण काळे यांनी सांगितले.