कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाच लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याज दराने म्हणजेच बिनव्याजी देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. असा निर्णय घेणारी सबंध देशातील ही पहिली आणि एकमेव बँक असल्याचेही ते म्हणाले. बँकेच्या ८३ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
शेती पंपाच्या विजबिल थकबाकीदार पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने बँकेने महत्त्वपूर्ण धोरण घेतल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, विजबिल थकबाकीदारासाठी महावितरणने ५० टक्के सुटीचे धोरण याआधीच जाहीर केले आहे. अशा आर्थिक अडचणीत असलेल्या पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांसाठी उर्वरित पन्नास टक्के वीज बिलासाठी पाच वर्षांच्या मुदतीची मध्यम मुदत कर्ज योजना जाहीर केली.
या कृषीसंजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला उर्वरित पन्नास टक्के विजबिल भरण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात १८ कोटी २२ लाख रुपये इन्कमटॅक्स भरून बँक इन्कमटॅक्स विभागाच्या कोल्हापूर परिक्षेत्रात बिगर कंपनी विभागात जास्त इन्कमटॅक्स भरण्यामध्ये प्रथम आल्याचे श्री. मुश्रीफ म्हणाले.
केडीसीसी बँक जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यात नेहमीच अग्रस्थानी.
शेतकऱ्यांना करावयाच्या पिक कर्ज आराखड्यामध्ये आपल्या बँकेला १,३७२ कोटी रुपयांचा ईष्टाक दिला होता. तो पार करीत बँकेने २,३९० कोटी रुपये म्हणजे तब्बल १७४ टक्के ईष्टाक पूर्तता केलेली आहे. जिल्ह्याच्या एकूण ३,२९८ कोटी पिक कर्ज वितरणामध्ये एकट्या केडीसीसी बँकेचा वाटा तब्बल ७२ टक्के आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी
सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने म्हणजेच बिनव्याजी देण्याचा महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय केडीसीसी बँकेने घेतला आहे. पाच लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी देणारी केडीसीसी ही महाराष्ट्रासह बहुदा देशातील पहिली आणि एकमेव बँक ठरेल.
शेतकऱ्यांना अपघाती विमा सुरक्षा
शेतात काम करताना अगर अन्य कारणाने शेतकऱ्यांचे अपघात सरास होत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा, या भावनेने शेतकरी अपघाती विमासुरक्षा योजना प्रभावीपणे राबविली. किसान क्रेडिट कार्डधारक २ लाख ५२ हजार ३७१ शेतकऱ्यांना बँकेने स्वतःच्या नफ्यातून विमा हप्ता रक्कम देऊन ही योजना लागू केली आहे.