Karwand Mahotsav – छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी गुणवंताबाईराजे यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतीनिमित्त आयोजित बुलढाणा जिल्ह्यातील करवंड येथे “ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६” हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. करवंड येथे महाराणी गुणवंताबाई यांचे भव्य स्मारक उभारणे तसेच सर्व बुरुज व राजवाड्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. या कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, आमदार सौ. श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार धीरज लिंगाडे, अनिकेतराजे निंबाळकर, माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर तसेच हरिचंद्र प्रताप रुद्र इंगळे, शकीलाबाई हरिचंद्र इंगळे (महाराणी गुणवंताबाई इंगळे यांचे वंशज) यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करवंड मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आपण आज केवळ इतिहास वाचत नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवत आहोत. ज्या पवित्र भूमीवर हा विवाह सोहळा पार पडला, त्या ठिकाणी उपस्थित राहणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सोहळा आपली परंपरा, संस्कृती आणि वैभवाचा जिवंत वारसा आहे. पूर्वी छत्रपतींचा इतिहास झाकोळण्याचे प्रयत्न झाले असले तरी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने तो व्यापक स्तरावर पुढे आणण्याचे काम केले आहे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. महाराणी गुणवंताबाईराजे यांच्या विवाह सोहळ्याचा वारसा आजही तितक्याच अभिमानाने जपला जात आहे. या सोहळ्यात महाराणींच्या वंशजांची उपस्थिती हा विशेष सन्मानाचा क्षण आहे. करवंड येथील पडझड झालेल्या बुरुजांचे पुनरुज्जीवन आणि येथे उभा असलेला ऐतिहासिक राजवाडा पुन्हा जनतेसमोर सजीव स्वरूपात उभा करणे हीच आपली संकल्पना आहे. हा प्रस्ताव शासनाकडे मांडला असून, मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला लवकरच मान्यता मिळेल, असा ठाम विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला असून या ठिकाणाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.