Politics News : ‘दलित असल्यामुळे मला टार्गेट केले’; ‘या’ मंत्र्याची राज्य मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची घोषणा
Politics News : वाल्मिकी महामंडळातील कथित ८९.६३ कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपांवरून कर्नाटकचे मंत्री बी. नागेंद्र यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. ‘दलित असल्यामुळे लक्ष्य केले’ असा आरोप.

Politics News : वाल्मिकी महामंडळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून कर्नाटकातील राजकारण तापले असताना मंत्री बी. नागेंद्र यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यावेळी भावूक झालेल्या नागेंद्र यांनी आपल्याला केवळ आपण दलित असल्यामुळे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला.
“वाल्मिकी महामंडळातील व्यवहारावर माझी स्वाक्षरी कुठे आहे? मला दलित असल्यामुळे लक्ष्य केले जात आहे,” असा सवाल नागेंद्र यांनी केला. कथित व्यवहारांमध्ये बँकांची भूमिकाही असल्याचे सांगत, “मग केंद्रीय अर्थमंत्री जबाबदार आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कर्नाटकातील जनता सर्व काही पाहत असून, दररोज माझ्याविरोधात हजारो खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, असा दावा त्यांनी केला.
नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या घोषणेपूर्वीच भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात JD(S) कडून त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. विरोधकांनी महार्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळाच्या निधीच्या कथित वळवणुकीशी नागेंद्र यांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी कर्नाटक विधिमंडळाच्या आत आणि बाहेर आंदोलनही केले.
भाजप आणि JD(S) यांनी १ ते १० सप्टेंबरदरम्यान रायचूर ते बल्लारी अशी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. नागेंद्र यांना मंत्रिमंडळातून हटवावे, अशी त्यांची मागणी आहे.
प्रकरण नेमके काय?
मे २०२४ मध्ये महार्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील तत्कालीन लेखा अधीक्षक पी. चंद्रशेखरन यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी मागे ठेवलेल्या सहा पानी चिठ्ठीत महामंडळाच्या निधीच्या अनियमित वापरासह अनधिकृत हस्तांतरणाचे आरोप केले होते.
त्यानंतरच्या तपासात महामंडळाच्या खात्यातून ८९.६३ कोटी रुपये युनियन बँक ऑफ इंडियाच्या एका खात्यात हस्तांतरित झाल्याचे समोर आले. त्यानंतर ही रक्कम अनेक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात आढळले. या प्रकरणामुळे कर्नाटकाच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला.
या प्रकरणाच्या वेळी नागेंद्र हे आदिवासी कल्याण मंत्री होते. त्यानंतर त्यांनी जून २०२४ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ३ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आणि त्यांच्याकडे नियोजन व सांख्यिकी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या पुनरागमनानंतर विरोधकांनी पुन्हा त्यांच्या हकालपट्टीची मागणी सुरू केली होती.
नागेंद्र यांनी यापूर्वी राजीनामा देणार असल्याच्या वृत्तांचा इन्कार केला होता. त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचे ते सांगत होते. तसेच ‘मनुवादीं’विरोधात लढण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.





