मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या सांगलीतील जत तालुक्यावर दावा करण्याची तयारी आम्ही करत असल्याचे विधान बसवराज यांनी बंगळूरमध्ये केले. माध्यमांशी संवाद साधत त्यांनी हे भाष्य केले तसेच याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नी शिंदे फडणवीस सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. यासाठी उच्च स्तरीय समितीची बैठक देखील घेण्यात आली. मात्र कर्नाटक सरकारकडून सीमाप्रश्नावर काऊंटर म्हणून हे विधान केलं गेल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. सीमाप्रश्नामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
सांगलीच्या जतं तालुक्यातील ४० गांवाना दुष्काळाचा सामना करावा लागतो मात्र काही वर्षांपूर्वी येथील गावांनी एक ठराव केला होता त्याचा दाखला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी दिल्याचे यावेळी दिसून आले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जत तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी सुविधा मिळत नसल्याने कर्नाटक राज्यात समावेश करा असा प्रस्ताव मांडला होता आणि त्याला मंजुरी देण्यात आली होती असा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.