कान्हे (सोपान येवले) -मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणारे कान्हे रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरील दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कान्हे, टाकवे या ठिकाणी मोठ्या मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. येथे येणारा कामगार वर्ग व नागरिकांची संख्याही मोठी आहे. बाहेरगावाहून येथील कंपन्यांमध्ये येणारे अधिकारी व पुण्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील गैरसोयीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अंदर मावळ मधील टाकवे, वडेश्वर, कशाळ, भोयरे, इंगळून, खांडी, कुसुर, माऊ, कोंडीवडे आदी गावातील नागरिकांना कान्हे रेल्वे स्टेशन जवळचे आहे. पुणे-मुंबई, लोणावळा, वडगाव येथे जाणारे नागरिक स्वस्त प्रवास म्हणून रेल्वेने जातात. त्यामुळे या रेल्वे स्टेशनवर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. येथील रेल्वे स्टेशनवर शौचालय असूनही नसल्यासारखेच आहे. कारण या शौचालयामधून अत्यंत दुर्गंधी येत आहे. कित्येक दिवसांपासून हे शौचायल बंद अवस्थेत आहे. आतमध्ये विटा व फरशींचे तुकडे पडलेले असून शौचालयाचा दरवाजाही तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवासी येथील शौचायलयाचा वापर करीत नाहीत. शौचायल बंद असल्यामुळे महिलांची फारच कुचंबणा होत आहे.
येथील बसण्याच्या बाकड्यावर व आजूबाजूला कचरा दिसून येतो. तसेच शिळ्या व कुजलेल्या अन्नाचीही दुर्गंधी पसरलेली आहे. रेल्वे तिकीट घरासमोर ही मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडलेल्या अवस्थेत आहे. तसेच रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याचा एक नळ बंद असून केवळ एकच नळ सुरू आहे. पाणी पिण्याच्या बेसिनमध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साचला आहे. तसेच काही बेशिस्त प्रवाशांनी गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसते. दुपारी बारा ते तीन या वेळेत येथील तिकीट घर बंद असते, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली आहे. दुपारच्या वेळी पुणे-लोणावळा लोकल गाड्यांच्या फेऱ्या बंद असल्याने या काळात रेल्वे स्टेशनवर आलेल्या प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
कान्हे रेल्वे स्टेशनवरून पुणे मुंबई यासारख्या शहरात जाण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वे हा उत्तम मार्ग मानतात. मात्र रेल्वे स्टेशनवर मूलभूत सुविधा मिळत नसल्याने काही ज्येष्ठ नागरिक व महिला रेल्वेने प्रवास करणे टाळतात. पुणे लोणावळा ही दोन्ही स्टेशन जंक्शन असल्याने तिथे मिळणाऱ्या सुविधांच्या तुलनेत कान्हे येथील स्टेशनवर मिळणाऱ्या मूलभूत सुविधा खूपच अपुऱ्या आहेत. कान्हे रेल्वे स्टेशनवरही सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.