Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत नेहमीच त्यांच्या बिनधास्त मतांसाठी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांच्या व्हायरल व्हिडिओवर केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्यांच्या एका मुलाखतीमुळे त्या पुन्हा चर्चेत आहेत. या मुलाखतीत कंगनाने स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच मासिक पाळी या विषयावरही खुलेपणाने मत मांडलं. बालपणाच्या आठवणी शेअर एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाल्या, “मासिक पाळीबद्दलचं शिक्षण आपल्याला शाळेत नववीत मिळतं, पण तोपर्यंत अनेक मुलींना पाळी आलेली असते. पुस्तकात याबद्दल जे लिहिलं असतं ते अतिशय वरवरचं असतं. मला खूप उशिरा पाळी आली. तोपर्यंत मी बाहुल्यांसोबत खेळत होते आणि आईला चिंता वाटायची. एके दिवशी अचानक उठल्यावर बेडशीटवर रक्त होतं, जे माझ्यासाठी भयानक होतं. मला विश्वासच बसत नव्हता की आता दर महिन्याला हेच होणार. पण आई मात्र त्यावेळी खूप आनंदी होती.” “त्या दिवसांत मला स्वतःचं अस्तित्व घाणेरडं वाटायचं” मुलाखतीत जेव्हा कंगनाला पाळीदरम्यान मंदिरात न जाण्याबाबत विचारलं, तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं, “हो, आमच्याकडे अशा प्रथा होत्या. मात्र मी कधी मंदिरात जाण्यासाठी आग्रह धरला नाही. कारण त्या दिवसांत मलाच माझं अस्तित्व घाणेरडं वाटायचं. मला कुणाशी बोलायची इच्छा नव्हती. त्या वेळेस आई आमच्याबद्दल खूप संवेदनशील असायची.” “हीच विश्रांती घेण्याची वेळ आहे” कंगना पुढे म्हणाल्या, “अनेक ठिकाणी पाळीदरम्यान महिलांना मंदिरात किंवा स्वयंपाकघरात जाण्यास विरोध केला जातो. पण जर एखाद्याकडे पर्याय नसेल तर तिला जावंच लागतं. मी माझ्या घरी एकटी राहते, त्यामुळे मला स्वयंपाक करावाच लागतो. मात्र जेव्हा महिला पाळीदरम्यान वेदनेत असते, तेव्हा तिच्याकडून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. म्हणूनच त्या देवासमोर जाण्याची इच्छा बाळगत नाहीत. खरं तर हीच वेळ आहे की महिलांनी स्वतःला विश्रांती द्यावी.”