Kamshet Traffic Jam – शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य बाजारपेठ, प्रमुख चौक तसेच रस्त्यांच्या कडेला व्यापाऱ्यांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहनचालक, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामशेत हे पुणे-मुंबई मार्गावरील महत्त्वाचे शहर असल्याने याठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यातच बाजारपेठ परिसरात व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर माल मांडणे, फूटपाथवर कब्जा करणे तसेच दुकानासमोरील सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणे वाढले आहे. परिणामी नागरिकांसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत असून वाहतुकीची कोंडी नित्याची बाब बनली आहे. विशेषतः सकाळी शाळा आणि कार्यालयांची वेळ तसेच सायंकाळी बाजारपेठेतील गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी दोन वाहने एकाच वेळी जाणे कठीण होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे रुग्णवाहिका, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठ अतिक्रमण (संग्रहित छायाचित्र) मंगळवारी परिसरात आठवडे बाजार भरत असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभिर होते. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांऐवजी रस्त्यातूनच चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. दरम्यान, प्रशासनाने वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. भाडेतत्वावर दिली जातेय सार्वजनिक जागा स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील जागा इतर व्यावसायिकांना भाड्याने देऊन तिथे छोटे स्टॉल, हातगाड्या आणि तात्पुरती दुकाने उभी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मूळ रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली असून वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. दुकानासमोरची सार्वजनिक जागा खासगी मालमत्तेसारखी वापरली जात आहे. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले आहे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. पार्किंगच्या अभावामुळे व्यवसायावर परिणाम वाहतूक कोंडीमुळे व्यापारी वर्गालाही फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने अनेकजण शहरात येणे टाळत असल्याचे सांगितले जात आहे. याचा परिणाम स्थानिक व्यवसायावर होत असल्याची भावना काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तर काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाने नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी केली आहे. “अतिक्रमणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वाहतूक पोलिसांचा देखील याठिकाणी अभाव असतो. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची गांभिर्याने दखल घेणे गरजेचे आहे.” – युवराज शिंदे, ग्रामस्थ, कामशेत