Kamini Kaushal : बॉलिवूडवर दुःखाचा सावट पसरलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले. त्या गेल्या काही वर्षांपासून वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांशी झुंज देत होत्या. कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल कुटुंब लो-प्रोफाईल ठेवत असून सध्या पूर्ण गोपनीयता ठेऊ इच्छित आहेत. १९४६ मध्ये केलेलं पदार्पण २४ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी १९४६ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कृष्णधवल (ब्लॅक-ॲण्ड-व्हाईट) काळात त्यांनी आपल्या सहज अभिनय आणि प्रभावी उपस्थितीने रसिकांची मनं जिंकली. त्या काळातील सशक्त महिला भूमिका पडद्यावर उतरवणाऱ्या पहिल्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद यांच्यासोबत काम कामिनी कौशल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये शहीद, नदिया के पार, शबनम, बिराज बहू, आरजू, दो भाई, ज़िद्दी, पारस, नाईट क्लब इत्यादींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली ‘नीचा नगर’ कामिनी कौशल यांच्या ‘नीचा नगर’ या चित्रपटाने पहिल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार जिंकत इतिहास रचला होता. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय कामगिरींपैकी ही एक महत्त्वाची उपलब्धी मानली जाते. टीव्हीवरही मजबूत उपस्थिती चित्रपटांबरोबरच कामिनी कौशल टीव्हीवरही सक्रिय होत्या. दूरदर्शनवरील ‘चांद सितारे’ ही त्यांची मालिका प्रेक्षकांनी विशेष पसंत केली होती. धर्मेंद्र यांच्या पहिल्या को-स्टार बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांनीही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की त्यांच्या पहिल्या चित्रपट ‘शहीद’मध्ये त्यांची को-स्टार कामिनी कौशल होत्या. धर्मेंद्र यांनी त्यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर करत, “माझ्या पहिल्या चित्रपटाची पहिली हिरोईन, कामिनी कौशल. दोघांच्या चेहऱ्यावरची हसरी भेट विसरण्यासारखी नाही,” असं म्हटलं होतं. कौटुंबिक श्रद्धांजलीची प्रतीक्षा कामिनी कौशल यांच्या पश्चात त्यांचे तीन मुलगे श्रवण, विदुर आणि राहुल सूद असा परिवार आहे. कुटुंबाकडून अधिकृत निवेदन अद्याप आले नसले तरी संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.