पुणे -शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकता व देशाभिमानाची जाणीव निर्माण करणे, बॅंडच्या माध्यमातून कृती, साहस व प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे यासाठी राष्ट्रीय स्तरावरील बॅंड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियल येथे 21 ते 30 जानेवारी या कालावधीत अंतिम स्पर्धा होणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात, स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने शाळांमधील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बॅंड स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर (उपांत्य फेरी), राष्ट्रीयस्तर (अंतिम फेरी) या तीन स्तरावर स्पर्धा होणार आहे. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना ही स्पर्धा खुली असणार आहे. शाळांकडून बॅंडचे व्हिडीओ मागवून घ्यायची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या (डायट) प्राचार्यांवर सोपविण्यात आलेली आहे, अशी माहिती उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे यांनी दिली.
22 डिसेंबरपर्यंत राज्यस्तरावररुन राष्ट्रीय उपांत्यस्तर स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार आहे. 29 डिसेंबरपर्यंत उपांत्य फेरीतील विजेत्या स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. 30 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीतील विजेत्या स्पर्धकांना निकाल कळविण्यात येणार आहे. 20 जानेवारी रोजी विजेत्या स्पर्धकांना नवी दिल्ली येथे उपस्थित रहावे लागणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.