Kaas Lake – युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या कास तलाव परिसरात बेकायदा वृक्षतोडीचा खेळ उघडपणे चालला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पर्यावरण अक्षरशः मरणाच्या दारात उभे ठाकले आहे. संरक्षणासाठी नेमलेली यंत्रणा झोपेत असताना उपद्रवी प्रवृत्ती मात्र रात्रीच्या आडोशाने वृक्षसंपदेची कत्तल करत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. सातारा नगरपालिकेच्या मालकीचा सुमारे २५ एकर परिसर आणि १८८१ मध्ये उभारलेला ऐतिहासिक कास तलाव हा नैसर्गिक संपत्तीचा अनमोल ठेवा मानला जातो. डोंगराळ भागातून येणारे पाणी साठवून ठेवणाऱ्या या तलावाभोवतीची झाडे मातीची धूप रोखण्यासाठी आणि जैवसाखळी टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र, हेच संरक्षक कवच आज कुर्हाडीखाली कोसळताना दिसत आहे. तलावालगतच्या जुन्या बंगल्याच्या परिसरात मोठमोठी झाडे तोडून त्यांचे ढिगारे रचले जात आहेत. ही वृक्षतोड इतक्या उघडपणे सुरू असताना नगरपालिकेचे सुरक्षारक्षक आणि वन विभागाचे कर्मचारी नेमके काय करत आहेत, हा प्रश्न नागरिकांच्या मनात संताप निर्माण करणारा ठरत आहे. पाच सुरक्षारक्षक, दोन नळकरी आणि वनमजूर अशी फौज तैनात असूनही बेकायदा कत्तल थांबत नसेल, तर ही यंत्रणा केवळ दिखाऊपणासाठीच आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. जावळी वन परिक्षेत्राचे प्रभारी अधिकारी संदीप जोपाळे यांना या प्रकाराची साधी कल्पनाही नसल्याने ही बाब अधिक गंभीर आहे. भरारी पथकाच्या कारवाया कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे. जागतिक वारसा स्थळाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणांची ही उदासीनता लाजिरवाणी म्हणावी लागेल. हिरवा श्वास गुदमरु नये आधीच वृक्षलागवडीच्या नावाखाली ढोंग सुरू असताना उरलेल्या वृक्षांवरच कुऱ्हाड चालवण्याची विकृत मानसिकता या परिसराला उजाड करण्याचा कट असल्याचे स्पष्ट दिसते. ही वृक्षतोड केवळ पर्यावरणावरच नव्हे, तर संपूर्ण अन्नसाखळीवर घाला घालणारी ठरत आहे. वेळीच कठोर कारवाई करून दोषींना धडा शिकवला नाही, तर कास तलावाचा हिरवा श्वास कायमचा गुदमरू शकतो. सातारा नगरपालिका आणि वन विभागाने आता तरी जागे होऊन केवळ आश्वासनांची नव्हे, तर ठोस कृतीची भाषा बोलणे गरजेचे आहे.