K. Kavitha। तेलंगणाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय अधिकृतपणे संपला आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) च्या सदस्या कलवकुंतला कविता म्हणजेच के.कविता यांचा विधान परिषदेतील (MLC) राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी सभागृहात कविता यांच्या भावनिक भाषणानंतर परिषदेचे अध्यक्ष गुट्टा सुखेंद्र रेड्डी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. विधिमंडळ सचिवांनी या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. कविता २०२१ मध्ये निजामाबाद स्थानिक संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर, ही जागा आता अधिकृतपणे रिक्त घोषित करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यात आणखी एका पोटनिवडणुकीची शक्यता निर्माण झाली आहे. कविता अश्रू अनावर K. Kavitha। के.कविता यांचा राजीनामा स्वीकारण्यापूर्वी परिषदेच्या कामकाजादरम्यान एक अत्यंत भावनिक दृश्य पाहायला मिळाले. सभागृहात भाषण करताना कविता यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात केंद्रीय एजन्सींनी त्यांना लक्ष्य केले तेव्हा पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना सोडून दिल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या माजी पक्षावर (BRS) तीव्र हल्ला चढवला. कविता म्हणाल्या, “ज्या पक्षाशी माझा आता कोणताही संबंध नाही अशा पक्षातून मी ज्या पदावर होते त्या पदावर राहणे माझ्यासाठी नैतिकदृष्ट्या चुकीचे होते.” त्यांनी बीआरएसच्या संविधानाला “विनोद” म्हटले आणि आरोप केला की, हा पक्ष आता तेलंगणा चळवळीशी विश्वासघात करणाऱ्यांसाठी आश्रयस्थान बनला आहे. राजीनामा कधी दिला? कविता यांनी निलंबनाच्या फक्त एक दिवसानंतर ३ सप्टेंबर २०२५ रोजी बीआरएसच्या प्राथमिक सदस्यत्व आणि एमएलसी पदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यावेळी अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. अलीकडेच, २ जानेवारी रोजी, त्यांनी स्वतः अध्यक्षांची भेट घेतली आणि त्यांची बाजू मांडण्याची संधी मागितली, त्यानंतर सोमवारी ते अंतिम करण्यात आले. राजीनाम्याचे खरे कारण K. Kavitha। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, कविता आता त्यांच्या “तेलंगणा जागृती” या संघटनेचे पूर्ण राजकीय पक्षात रूपांतर करण्याची तयारी करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या एक नवीन शक्ती म्हणून उदयास येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बीआरएसमधील दरी उघड झाली आहेच, शिवाय तेलंगणाच्या त्रिकोणी राजकारणात एक नवीन समीकरणही निर्माण झाले आहे.