मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहोत, असे म्हणत केसीआर यांनी देशात भाजपविरुद्ध तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या तिसऱ्या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशी चर्चा होती. तो दिवस आज उजडला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी भेट झाली आहे. हे आमच्यासाठी सौभाग्य आहे. आमच्यातील सदिच्छ भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही. तसेच देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचे भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली. संपूर्ण देशात राज्य एकमेंकाचा शेजारधर्म विसरले आहेत. पण राज्याराज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
चंद्रशेखर राव म्हणाले की, ”महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे. तसेच भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. केंद्र सरकारने आपले धोरण बदलायला हवे. असे न केल्यास पुढे जाऊन त्यांना हे सर्व भोगावे लागणार आहे.”