नवी दिल्ली : कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या अडचणी आता वाढणार असल्याचे दिसत आहे. कारण त्यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखा या घोटाळा प्रकरणाची चौकशी करत आहे. हे प्रकरण 10 हजार कोटी जमीन घोटाळ्याचे आहे. ज्योतिरादित्य सिंधियांवर एकच जमीन अनेक वेळा विकल्याचा आरोप आहे. त्याचसोबत सरकारी जमीन विकल्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे. 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास झाला होता त्याचीच पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताना ज्योतिरादित्य सिंधियांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. कॉंग्रेसमध्ये नवीन नेतृत्वासाठी चांगले वातावरण नाही. मध्य प्रदेशच्या कॉंग्रेस सरकारवर देखील त्यांनी यावेळी आरोप केले. सरकार शेतकरी आणि तरुणांना दिलेले आश्वासन पूर्ण करु शकली नाही. तसेच त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
दरम्यान, 1967 मध्ये कॉंग्रेसने माझ्या आजीला डावलले. त्याचप्रमाणे त्यांनी मला सुध्दा डावलले, असल्याचा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला आशिर्वाद देत भाजपमध्ये संधी दिली. याबद्दल त्यांनी पंतप्रधानानांचे आभार मानले. शिवराज सिंह यांच्यासोबत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने जोमाने काम करु, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.