टोरॅंटो – मानवी हक्क कार्यकर्त्या करिमा बलोच यांचा या आठवड्याच्या सुरवातीला झालेल्या गूढ मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे.
जगभरातील नामवंत कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षण तज्ज्ञ, बुध्दीवादी अशा 350 जणांनी बलोच यांच्या मृत्यूची टोरॅंटो पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. टोरॅंटो पोलिसांनी 23 डिसेंबर रोजी झालेला मृत्यू हा गुन्हेगारी स्वरूपाचा नसल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र बलोच यांचे मित्र आणि कुटुंबियांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आग्रह धरत आहेत. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात होणाऱ्या मानवी हक्क उल्लंघनाबाबत बलोच यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला होता.
करीमा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी “जस्टीस फॉर करीमा’ ही मोहीम सुरू केली आहे. कार्यकर्त्यांचे अपहरण करून हत्या करायची आणि गूढरित्या मृतदेह फेकून द्यायचा, ही पाकिस्तानात सर्रास वापरली जाणारी पध्दत आहे, असे तह सिद्दीकी यांनी सांगितले. 2018 मध्ये त्यांचेही अपहरण करण्यात आले. त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सध्या ते पॅरिसमध्ये रहात आहेत.
सिद्दीकी हे बलोच यांना न्याय मिळावा, म्हणून सुरू असणाऱ्या आंदोलनातील महत्वाचे सूत्रधार आहेत. ते म्हणाले, आता परदेशातही गूढ मृत्यू पहायला मिळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील जाच सोसणाऱ्या समाजांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात केवळ पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणाच नव्हे तर चीनी यंत्रणाही त्यात सहभागी असू शकतात, अशी शक्यता सिद्दीकी यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत या निवेदनावर साडेतीनशेपेक्षा अधिक लोकांच्या स्वाक्षरी झाल्या आहेत. अधिकाधिक स्वाक्षरी गोळा करून कॅनडाचे प्रशासन आणि संयुक्त राष्ट्रेमधील विविध समिती आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात येणार आहे. बलुचिस्तानमधील सर्वात मोठ्या बलोच विद्यार्थी संघटनेच्या करिमा या पहिला महिला अध्यक्ष होत्या. बलोच राष्ट्रीय चळवळीच्या त्या सदस्य होत्या. 2016 मध्ये बीबीसीने त्यांचा समावेश सर्वात प्रभावशाली 100 महिलांमध्ये केली होती.
आपल्या सक्रिय राजकारणामुळे बलोच या तरूण महिलांचे प्रेरणास्रोत होत्या. मानवी हक्कासाठी लढणाऱ्या बलोच लढ्याला करिमा यांनी नवे रूप प्राप्त करून दिले. महिलांसाठी नेतृत्वाची अनेक द्वारे त्यांनी खुली केली.
सुरक्षेसाठी त्या कॅनडात स्थायिक झाल्या. मात्र, बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात सातत्याने आवाज उठवत असत. नागरिकांचे अचानक नाहीसे होणे, छळ, आणि न्यायबाह्य हत्यांविरोधात त्या सर्व उपलब्ध व्यासपीठावर बोलत असत. बलुचिस्तानमधील पाकिस्तानी शासनकर्त्यांच्या “मारा आणि गाडा’ या धोरणाच्या प्रखर टीकाकार होत्या.
पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांच्या धमक्या करिमा बलोच यांना येत असत. त्यांचे कुटुंबीय आणि पतीलाही त्यांनी धमक्या दिल्या होत्या. त्यांच्या काकांचे अपहरण करून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले. त्यांच्या आईला त्यांनी सरकारवर टीका बंद केल्यानंतर काकांना सोडू असे सांगितले. जेंव्हा त्यास नकार दिला त्यावेळी त्यांच्या काकांच्या मृतदेहाचे तुकडे पाठवून देण्यात आले.
हा काही पहिला बळी नव्हे –
करीमा यांचा गूढ मृत्यू ही काही या वर्षातील पहिली घटना नाही. यापुर्वी मे 2020 मध्ये बलुचिस्तानमधील मानवी हक्क उल्लंघनाबाबत लिहणारा पत्रकार साजिद हुसेन याचा मृतदेह स्वीडनमध्ये नदी किनारी मिळाला होता. त्यापुर्वी दोन महिने तो बेपत्ता होता. करीमाप्रमाणेच त्याने जीविताच्या सुरक्षिततेसाठी स्वीडनमध्ये आश्रय घेतला होता. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यू किंवा आत्महत्या या दोन बाजूंचाच विचार केला आहे. त्याचा अन्य बाजूंचा विचार केला नाही.
हत्येसाठी संघटना?
पाकिस्तानी सैन्याचे जनरल असीफ गफूर यांनी बोझकुर्तलर या तुर्किश बंडखोरांच्या हत्या करणाऱ्या गटाची पाकिस्तानी आवृत्ती काढण्याचे संकेत दिले आहेत. काही वर्षापुवी जनरल परवेझ मुशर्रफ यांनी परदेशातील पाकिस्तानी बंडखोरांच्या हत्येचे संकेत मुलाखतीद्वारे जाहीरपणे दिले होते. अल्ताफ हुसेन या नेत्याच्या लंडनमध्ये झालेल्या हत्येचे त्यांनी समर्थन केले होते.