<p data-start="87" data-end="466"><strong>Pradnya Satav : </strong> काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांच्या राजकीय प्रवासाला अवघ्या 119 दिवसांत नवं वळण मिळालं आहे. आमदारकीचा कार्यकाळ 2030 पर्यंत असतानाही त्यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी विधान परिषद सदस्यत्व आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्याच जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.</p> <p data-start="468" data-end="867">यावरुन प्रज्ञा सातव यांनी नियोजनबद्ध पद्धतीने राजीनामा दिल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी 12 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. संख्याबळ पाहता ही जागा भाजपच्या खात्यात जाणार असल्याने पक्षाने पुन्हा सातव यांनाच संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा आमदार म्हणून विधान परिषदेत जाणार आहेत.</p> <p data-start="869" data-end="1095">दरम्यान, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. विधान परिषदेत काँग्रेसचं संख्याबळ आठवरून सातवर आलं असून विरोधी पक्षनेतेपदावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या पदासाठी किमान आठ आमदारांची अट आहे.</p> <p data-start="1097" data-end="1387">प्रज्ञा सातव या दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. 2021 मध्ये राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्यानंतर 2024 मध्ये काँग्रेसकडून त्यांना पुन्हा आमदार करण्यात आलं होतं. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत होत्या. मात्र, त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.</p> <h3 data-start="1097" data-end="1387"><strong>विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर (Pradnya Satav)</strong></h3> <div style="width: 1290px" class="wp-caption aligncenter"><img loading="lazy" decoding="async" src="https://images.mid-day.com/images/images/2025/dec/PradnyaSatavInsta-1766024637720_d.png" alt="Pradnya Satav" width="1280" height="720" /><p class="wp-caption-text">Pradnya Satav : काँग्रेसमधून भाजपात प्रवेश; आता ‘या’ महिला नेत्या पुन्हा आमदार होणार? हालचालींना वेग</p></div> <p data-start="1389" data-end="1708" data-is-last-node="" data-is-only-node="">विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला 8 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीने अतिरिक्त उमेदवार दिल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</p> <h3 data-start="1389" data-end="1708"><strong>काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका </strong></h3> <p data-start="1389" data-end="1708" data-is-last-node="" data-is-only-node="">काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील, तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल. मात्र, इतर कोणतेही प्रस्ताव असतील, तर त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक आहे.” तसेच त्यांनी राजीव सातव यांच्या जागेचा मुद्दाही उपस्थित करत, “ही जागा काँग्रेसची होती. मुख्यमंत्री <a href="https://www.dainikprabhat.com/following-rohit-pawars-sensational-revelation-sanjay-raut-drops-a-major-bombshell-he-stated-outright-devendra-fadnavis/" target="_blank" rel="noopener">देवेंद्र फडणवीस</a> यांनी पूर्वी सांगितलेल्या राजकीय संस्कृतीनुसार ही जागा काँग्रेसलाच देण्यात यावी,” अशी मागणी केली.</p> <p data-start="1389" data-end="1708" data-is-last-node="" data-is-only-node=""><strong>हेही वाचा : <a href="https://www.dainikprabhat.com/new-transfer-rules-major-decision-by-the-government-of-maharashtra-regarding-transfers-of-government-employees-government-resolution-issued">Transfer new rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठी निर्णय; शासन निर्णय प्रसिद्ध </a></strong></p>