Jitendra Aawhad : “हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं…”; अजित पवारांसमोर पंतप्रधानांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला आव्हाडांचे उत्तर

Jitendra Aawhad : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. यावरून आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
पंतप्रधानांनी शिर्डीत बोलताना, “आम्ही खरी नियत ठेवून शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहोत. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.” असे म्हटले होते.
अजित पवारांसमोरच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. तसेच अजित पवार गटाला टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी यांचाच एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

यात पंतप्रधान मोदी शरद पवारांचे कौतुक करत आहेत. शरद पवारांच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर बोलत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे, किती हा विरोधाभास! शरद पवार यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवारांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती.
जयंत पाटलांची एक्स पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे की, खालील व्हिडिओ बघितल्यावर मला वाटतं की पंतप्रधान मोदींना आपण आधी काय बोललो आहोत हे लक्षात राहत नसावं. परंतु, हे वक्तव्य करत असताना आमचे काही जुने साथीदार मंचावर बसले होते. पक्ष फुटीच्या आधी हेच लोक शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून आमदार आणि मंत्री झालेत. तेच लोक आज केवळ सत्तेच्या लालसेपोटी बघ्याच्या भूमिकेत राहून गप्प बसले आहेत. हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं. बाकी शेतकऱ्यांबाबत मोदींनी बोलावं, हादेखील मोठा विनोद आहे. वर्षभर शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. तेव्हा ७५० हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला. दुसरीकडे आमच्या बापाने शेतकऱ्यांसाठी या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केली होती.





