नवी दिल्ली: अनलॉक तीनमध्ये काही अटींसह सीनेमागृहे आणि जीम सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सीनेमागृहे सुरू करण्याचा प्रस्ताव माहिती व प्रसारण मंत्रालयाने गृहमंत्रालयाकडे पाठवला असून त्यावर गृहखात्यात गंभीरपणे विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
अनलॉक दोनची मुदत 31 जुलैला संपत आहे. त्यानंतर एक ऑगस्ट पासून अनलॉक 3 सुरू होणार आहे. मात्र सध्या वेगाने वाढणाऱ्या करोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर त्यात आणखी काही सवलती मिळण्याची शक्यता आहे. दै. प्रभातला मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन दिवसांत केंद्रीय गृहमंत्रालय त्याबाबतची अधिसुचना काढण्याची शक्यता आहे.
सिनेमागृहे सुरूकरण्याचा प्रस्ताव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाठवला आहे. त्याबाबत सीनेमागृहांच्या मालकांशी चर्चा करून आसन क्षमतेच्यता 25 टक्के प्रवेशावर सुरू करण्याचे या प्रस्तावात नमूद केले आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय गृहमंत्रालयच घेईल, असे या विभागातील एका जेष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
25 टक्के क्षमतेवर सिनेमागृह चालवणे मालकांना परवडणारे नाही. क्षमतेच्या किमान 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळायला हवी, असे सीनेमागृह चालकांचे म्हणणे आहे. पण किमान सुरवात तरी होत आहे, असा विचार करून सीनेमा चालक समाधान व्यक्त करत आहेत.
व्यायामशाळा चालकांची स्थितीही अशीच आहे. मर्यादित प्रवेशावर जीम सुरू करण्याची परवानगी मिळणे शक्य आहे. बॅचची निश्चित वेळ आणि सॅनिटायझेशनची सुविधा या मुद्द्यावर ही सवलत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, व्यायाम करताना मास्क असावा की नको याबाबत मतमतांतरे वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत असल्याने जीमचा समावेश अनलॉक एक आणि दोनमध्ये होऊ शकला नव्हता.
शाळा आणि मेट्रो सुरु करायला अद्याप वेळ आहे. जीम आणि सीनेमागृहे खुली करायला केंद्र सरकाच्या गृह खात्याने परवानगी दिली. त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेणार आहे, असे अधिकाऱ्यांनी “प्रभात’ला सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकार अनलॉक तीनच्या दिशेने पावले टाकत असताना काही राज्यांनी मात्र पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
तुर्त शाळा बंदच
सध्या परीक्षांचे निकाल लागण्याच कालावधी आहे. मात्र, तरीही नजिकच्या भविष्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता धुसर आहे. केंद्रीय मनुष्यनळ विकास मंत्रालयाने पलकांकडून शाळा सुरु करण्याच्या विषयावर पालकांची मते मागवली होती. पालकांन एिवढ्यात शाळा सुरु करायला नकार कळवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.