28 Police Suspended: झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मागील आठ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षीय पुष्पा महतो या विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून, जंगलात तिचा सांगाडा सापडला आहे. या प्रकरणाचा तपास दडपल्याच्या आणि मुख्य आरोपीला संरक्षण दिल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पिंड्राजोरा पोलीस ठाण्यातील सर्व २८ पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. नेमके प्रकरण काय? बोकारोच्या खुंटाडीह गावची रहिवासी असलेली पुष्पा महतो २१ जुलै २०२५ रोजी कॉलेजला जाते असे सांगून सायकलवरून निघाली होती, मात्र ती कधीच परतली नाही. पुष्पाच्या आई-वडिलांनी त्याच दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तब्बल १३ दिवसांनंतर या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची मेजवानी? पुष्पाच्या पालकांनी शेजारी राहणाऱ्या दिनेश महतो याच्यावर पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त केला होता. मात्र, तत्कालीन पोलीस पथकाने आरोपीकडून पैसे घेऊन त्याला क्लिन चिट दिली होती. इतकेच नव्हे तर, तपास सुरू असताना पोलीस कर्मचारी आणि आरोपीने एकत्र पार्टी केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी २३ सिम कार्ड्स आणि ४ मोबाईल फोन्सचा वापर केला होता. हायकोर्टाचा हस्तक्षेप आणि एसआयटीची कारवाई – सहा महिने उलटूनही तपास लागत नसल्याने पीडित कुटुंबाने झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली. हायकोर्टाने पोलीस अधीक्षक आणि पोलीस महासंचालकांची (DGP) खरडपट्टी काढत कडक इशारा दिला. त्यानंतर डीजीपी तदाशा मिश्रा यांच्या आदेशावरून स्थापन झालेल्या नवीन एसआयटीने अवघ्या दोन दिवसांत चक्रे फिरवली. ११ एप्रिल रोजी मुख्य आरोपी दिनेश महतोला अटक करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी कॉलेजपासून १ किमी अंतरावर असलेल्या जंगलातून पुष्पाचा सांगाडा आणि हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. हेही वाचा – Stock Market: ‘या’ कारणांमुळे शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 1264 अंकांनी वधारला, निफ्टी 24,200 पार अख्खे पोलीस स्टेशन ‘सस्पेंड’ – नव्या एसआयटीच्या अहवालानुसार, जुन्या पथकाने तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांनी कडक पाऊल उचलत १० सब-इन्स्पेक्टर, ५ असिस्टंट सब-इन्स्पेक्टर, २ हवलदार आणि ११ शिपाई अशा एकूण २८ जणांना निलंबित केले आहे. “आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी पैसे घेतल्याचे आणि संगनमत केल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले आहेत,” असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. एका कुटुंबाची वाताहत – मुलीच्या मृत्यूने महतो कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. “जर पहिल्याच दिवशी पोलिसांनी गांभीर्याने तपास केला असता, तर माझी मुलगी आज जिवंत असती,” अशा भावना पुष्पाच्या आईने व्यक्त केल्या. या केसच्या पाठपुराव्यामुळे पुष्पाच्या १६ वर्षांच्या भावाचे शिक्षण सुटले असून, तो आता राजस्थानमध्ये मजुरीसाठी गेला आहे. पीडित कुटुंबाने आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली आहे.