रांची: करोनाचा फैलाव रोखण्यासाठी झारखंडने लॉकडाऊनची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली. तसे पाऊल उचलणारे झारखंड हे पश्चिम बंगाल नंतरचे दुसरे राज्य ठरले आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. देशातील इतर राज्यांप्रमाणेच झारंखडमध्ये लॉकडाऊनच्या काळात विविध निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ती शिथिलता कायम राहणार आहे.
मात्र, झारखंडमधील शिक्षणसंस्था, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, बार, हॉटेल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, केशकर्तनालये, बससेवा बंदच राहणार आहे. झारखंडमध्ये जवळपास 2 हजार 300 करोनाबाधित आढळले आहेत.
त्यातील 12 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. इतर अनेक राज्यांच्या तुलनेत स्थिती बरी असली तरी सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचे धोरण झारखंडने अवलंबले आहे.