Jejuri News – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील देवदर्शनासह कुलधर्म – कुलाचारामध्ये कऱ्हा स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या देवघरातील देव (चांदीचे टाक) घेऊन येणारा भाविक हमखास कऱ्हा नदीतीरावर जाऊन स्नान करतो. आपल्या देवघरातील देवांना स्नान घालतो. काही श्रद्धाळू खंडोबा भक्त येथील पवित्र जल समजून आपल्या घरी सुद्धा घेऊन जातात. दर अमावस्येला या स्नानाने घरातील देवांना अभिषेक घालतात. मात्र, काही वर्षांपासून येथील कऱ्हा नदीतीरावरील “मल्हार सागर “जलाशय प्रचंड प्रदूषित झाला आहे.गराडे- पुरंदरमधील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून उगम पावणाऱ्या ऐतिहासिक कऱ्हा नदीवर जेजुरी नजीक नाझरे -धालेवाडी गावाच्या हद्दीत १९७६ साली मल्हारसागर धरण निर्माण झाले. ७८८ दशलक्षघनफुट पाणी साठवण क्षमता असलेल्या जलाशयातून जेजुरी शहर,औद्योगिक वसाहत, पारगाव माळशिरससह मोरगाव व बारामती तालुक्यातील १६ गावांसह ५० गावांना पाणीपुरवठा होतो. जलाशयावर अनेक गावांचा पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. मात्र, जलाशयाच्या स्वच्छतेबाबत प्रचंड दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. भाविक- भक्तांसाठी मल्हार सागर जलाशयालगत स्वच्छतागृहे, स्नानगृहे निर्माण केल्यास प्रदूषणावर आळा बसेल. मात्र, याबाबत प्रशासन व्यवस्थेसह पाणीपुरवठा करणाऱ्या विविध गावांच्या योजनांचेही या प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांना प्रशासकीय निष्क्रियतेचा भोग उत्तर पूर्व पुरंदर व उत्तर – पश्चिम बारामती तालुक्यातील गावांची संजीवनी समजले जाणारे मल्हार सागर धरण प्रशासकीय व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे प्रचंड प्रदूषित झाले आहे. मागील काळात जेजुरीतील जयमल्हार पतसंस्था व इतर समाज सेवी संस्थांच्या वतीने जलाशय पाणलोट क्षेत्रातील परिसराची स्वच्छता केली होती. परंतु जलाशयावर भाविकांचा स्नानदीविधींसह धार्मिक कार्यक्रम होत असल्याने मोठ्या प्रमाणावर निर्माल्य, कपडे विसर्जित केले जातात.