Jejuri News – कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी नगरीत बनावट भंडाऱ्याचा अजूनही सुळसुळाट असून धार्मिक विधी आणि भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आजही सर्रास सुरू आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध भेसळ प्रशासनाकडून डोळेझाक सुरू आहे. पुरातन काळापासून कुलदैवत खंडेरायाची जेजुरी आणि भंडारा याचे अनोखे नाते आहे. खंडेरायाच्या धार्मिक विधी, पूजा अभिषेक तळीभंडार, जागरण गोंधळ या विधीमध्ये भंडारा (हळद) हमखास लागतो. भाविक हे सर्व विधी केल्यानंतर मल्हारी मार्तंडाचा जयघोष करत भंडारा खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करीत आहे. पुरातन ग्रंथातही हळद-भंडाऱ्याचा उल्लेख हरिद्रचूर्ण असा केल्याचे दिसून येते. मात्र, काही वर्षांपासून सोनपिवळ्या भंडाऱ्याला भेसळीचे व बनावटीचे ग्रहण लागले आहे. राज्यातून येणाऱ्या भाविकांना ही बाब लक्षात येत नाही. मात्र, कमी भांडवलात जास्त नफा मिळवण्याचा प्रकार काही बाहेरील व्यापाऱ्यांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून “बनावट भंडाऱ्यावर कारवाई करा, ही मागणी ग्रामस्थांची प्रशासन व्यवस्थेकडे आहे. मात्र अन्न औषध भेसळ प्रशासनाचे अधिकारी नमुने घेतात. पुढे काहीच कारवाई होत नाही. बनावट भंडारा वितरक आणि प्रशासकीय अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची जोरदार चर्चा आहे. भाविकांच्या आरोग्याला बाधा बनावट भंडारा हा खाण्यायोग्य नसून कपाळावर लावल्यास त्वचेची जळजळ, डोळ्याची आग होणे, चुरचुरणे, डोळे लाल होणे, त्वचेवर काळे चट्टे उमटणे आदी प्रकार १५ वर्षांपासून घडत आहेत. (दि.२१) डिसेंबर २०२५ रोजी जेजुरी नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भंडारा उधळण होत असताना दुर्घटना घडली. संबंधित अधिकाऱ्यांनी दुकानांवर धाडसत्र करून काही नमुने, भंडारा वितरण करणारे चार चाकी वाहन ताब्यात घेतले होते. भंडारा त्याचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यात आहे. तीन महिन्यांत जत्रा- यात्रा उत्सवांचे दिवस, लग्नसराईचा हंगाम असल्याने भाविकांची लक्षणीय गर्दी होणार आहे. त्यात बनावट भंडारा पुन्हा विक्रीसाठी येत आहे. देवसंस्थान समिती, ग्रामस्थ खांदेकरी मानकरी मंडळाकडूनही बनावट, भेसळीच्या भंडाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यात कारवाईची कासवगती दिसून येत आहे. बनावट भंडारा कसा ओळखावा पारंपरिक विक्रेते अनिल दरेकर, महेश स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सांगली येथून पुरवठा होणारा आठ कंपनीची हळद, भंडारा आयएसओ मानाकिंत आहे. त्याच्या शुद्धतेची हमी आहे. तो धार्मिक विधींसह प्रसाद म्हणून भक्षण करता येतो. त्याचा दर प्रती १० किलोची पिशवी १६०० ते २२०० रुपयांपर्यंत आहे. मात्र, ज्या पिशवीवर खाण्यायोग्य नाही. सौंदर्यप्रसाधनाकरिता नाही, असे स्पष्ट प्रसिद्ध केलेल्या प्रती १० किलोच्या पिशवीवर ११०० ते १३०० रुपयांपर्यंत वितरक देतात. मात्र, भाविक हा भंडारा फक्त बैलजोड्यांची मिरवणूक, शर्यती, देवाच्या दारी उधळण्याकरिता पसंती देत आहेत. हा भंडारा खाण्यायोग्य नाही. फक्त उधळण करण्याकरिता आहे, ही माहिती खरेदी करणाऱ्या भाविकांच्या लक्षात येत नाही. ते स्वस्त मालाला पसंती देतात, अशी माहिती त्यांनी दिली. जेजुरीत विक्रीसाठी वितरित होणाऱ्या काही पिशव्यांवर तर कोणताही छाप किंवा कंपनीचे नाव नाही. विशेषतः नांदेड, हैद्राबाद येथून येणाऱ्या भंडाऱ्याचा दर्जा सुमार असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच सर्व प्रकार हा धार्मिक विधी आणि भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे. याविरोधात स्थानिक नगरपालिका, अन्न व औषध भेसळ प्रशासन आणि देवसंस्थान समिती आदींकडून संयुक्तिक ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात बनावट भंडाऱ्याचा बेरंग आरोग्याला बाधा पोहोचणार आहे.