जेजुरी – करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे जेजुरी येथील औद्योगिक वसाहतीची वाटचाल बिकट झाली आहे. दुष्काळी पुरंदर तालुक्याला रोजगारसंधीचा आधार या औद्योगिक वसाहतीमुळे मिळाला होता. लॉकडाऊनमुळे सुमारे दोनशे कंपन्यांना आर्थिक झळ बसली आहे. त्यामुळे आगामी एक वर्षांत उत्पादनाचा गाडा रुळावर आणण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला कष्टमय जाणार आहे. वसाहतीमध्ये सुमारे साडेतीन हजार परप्रांतीय कामगार असून त्यांची वाताहात झाली आहे. लॉकडाऊनमुळे सुमारे 100 कोटींच्यावर फटका बसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये 160 ते 200 कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये स्टील आणि प्लॅस्टिक, अन्न प्रक्रिया उद्योग निर्मितीवरील कंपन्या, औषध कंपन्या आदींचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांमध्ये कुशल आणि अकुशल कामगारांची संख्या 6 हजारांच्या घरात आहे. त्यात साडेतीन हजार कामगार परप्रांतीय आहेत. पुरंदर तालुक्यातील स्थानिक कामगारांची संख्या जेमतेम आहे.
24 मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे कामगारांचे हाल सुरू झाले. यावेळी स्थानिक ठेकेदारांनी जेजुरी देवसंस्थान, जीमा आणि जीसा यांच्यामार्फत तीन हजार कामगारांची जेवणाची सोय केल्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. संकटकाळात देवसंस्थानने माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
आता आपल्या गावीच जायचं
जेजुरी वसाहतीमध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राज्यस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड आदी राज्यांतील कामगारांची संख्या लक्षणीय आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर परप्रांतीय ठेकेदारांनी त्यांच्याच कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. काही स्थानिक ठेकेदारांनी कामगारांना दिलासा दिला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत कामगारांचे हाल झाल्यामुळे आता आपल्या गावीच जायचं, असा निर्धार परप्रांतीय कामगारांनी केला आहे. परप्रांतीय कामगारांना गावची ओढ लागल्यामुळे कारखानदार आणि कंपनी व्यवस्थापनाच्या जीवाला घोर लागला आहे.
धीम्यागतीने अर्थगाडा सुरू
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये काहीअंशी कारखाने व कंपन्या सुरू करण्याचे धोरण राबवले आहे. यात शासकीय नियमांचे सोपस्कार पूर्ण करून कंपन्या सुरू होणार आहेत. मात्र, कामगारांचा तुटवडा जाणवणार आहे. दीड महिन्यांपासून हलाखीचे जीवन जगणाऱ्या परप्रांतीय कामगारांना घराची ओढ लागली आहे. जरी कंपन्या सुरू होऊन हातांना काम मिळाले तरी त्यांची काम करण्याची मानसिक स्थिती राहिली नाही. त्यामुळे कंपन्यांना धीम्या गतीने अर्थगाडा हाकण्याची वेळ आली आहे. कामगारांची संख्या कमी पडणार असल्यामुळे त्याचा उत्पादननिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शहर परिसरातील बांधकामे ठप्प
जेजुरी शहर आणि परिसरात बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बांधकाम क्षेत्रात सुमारे 6 ते 8 हजार परप्रांतीय कामगार काम करीत आहेत. जेजुरी परिसरात बांधकाम क्षेत्रात प्लंबर, इलक्ट्रिशियन, फिटर, टाइल्स फिटींग आदी ठिकाणी काम करणारे परप्रांतीय आहेत. या परप्रांतीय कामगारांमुळे बांधकामे पूर्ण होणार आहेत. मात्र, हाती घेतलेल्या बांधकामांना याचा फटका बसणार आहे. आणखी सहा महिन्यांपर्यंत ही कामे संथगतीने सुरू राहणार आहेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना चिंता सतावू लागली आहे.