सोलापूर – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजप व शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. आता पक्षाला सावरण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सरसावले असून सोशल माध्यमांवरही सोशल वॉर सुरु झाले आहे. अशातच, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्याचा प्रारंभ आजपासून सोलापुरातून होत आहे. मात्र या जनयात्रेवर सोशल मीडियातून राष्ट्रवादीकडून चांगली टीका केली जात करत आहे. सोशल माध्यमांमध्ये या जनआशीर्वाद यात्रेला ‘जनसंताप यात्रा’ असे म्हणत ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने आदित्य ठाकरे यांच्यावर सरकारचा ढिसाळ कारभार, बेरोजगारी, मराठीचे हाल अशा अनेक समस्या असतांना आदित्य ठाकरेंनी काढलेली जनयात्रा म्हणजे जनसंतापच अशा शब्दात पोस्टरद्वारे टीका केली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या यात्रेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीही 6 ऑगस्टपासून शिवसुराज्य यात्रा काढणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.